Wednesday, October 16, 2019

अपरोक्षानुभूती : निराभास-1

आद्य शंकराचार्यांचा 'अपरोक्षानुभूती' हा वेदांताच्या प्रकरण ग्रंथाचा  (Introductory Text)  अभ्यास सध्या सुरु आहे.  पूर्ण होण्यास अजून सुमारे एक वर्ष लागेल असा अंदाज आहे. नंतर त्यावर विस्तृत लिहीनच.
परंतु या ग्रंथाचा २६वा श्लोक आणि त्यातील एक शब्द खूपच महत्वाचा वाटला. म्हणून त्यावर लिहितो आहे. हा आणि याच्या आधीच्या श्लोकांत आपण देहापासून कसे वेगळे आहोत हे आद्य शंकराचार्य समजावून सांगत आहेत. यापूर्वी द्रष्टा-दृश्य विवेक या गंथाचे परिशीलन करताना आपण देहापासून आपण कसे वेगळे आहोत याची विविध प्रकारे केलेली कारणमीमांसा पहिली आहे.  आपण म्हणजे हा देह नाही, मन नाही हे वेदान्ताचे प्रथम सांगणे आहे. जर आपण देह-मन नाही तर आपण कोण आहोत हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. या श्लोकात शंकराचार्य आपण कोण आहोत हे समाजविण्याची सुरुवात करीत आहेत.
या श्लोकातील 'निराभास' हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. आपण 'निराभास' आहोत असे शंकराचार्य सांगतात. 'निराभास' या शब्दाचा शब्दाश: अर्थ 'कोठल्याही भासाशिवाय' म्हणजे 'without reflection' असा होतो. या शब्दात अद्वैत वेदान्ताचे सार सामावलेले आहे. 
आपण आधी आपल्याला एखाद्या गोष्टीचे ज्ञान कसे होते हे जाणून घेऊ. अद्वैत तत्वज्ञानाप्रमाणे ही प्रक्रिया दोन भागात होते. याला वृत्तिव्याप्ती आणि फलव्याप्ती अशी नावे आहेत.
आपली पंचेंद्रिये ही केवळ बाह्यजगताशी संपर्क साधणारी साधने आहेत. ही पंचेंद्रीये प्रत्येक क्षणी कित्येक हजार बाइट्स डेटा मेंदूला पाठवीत असतात.  उदाहरणार्थ डोळे. आपल्याला वस्तू दिसते म्हणजे ती वस्तू आपल्या डोळ्यात शिरत नाही. या वस्तूपासून येणारे प्रकाशकिरण आपल्या डोळ्यात शिरतात. नेत्रपटलावर त्याची प्रतिमा उमटते. या प्रतिमेचे रूपांतर विद्युत स्पंदनांत होते. ही स्पंदने मेंदूच्या विशिष्ट भागातील पेशी उद्दिपित करतात. या पेशी या विद्युत स्पंदनांचे परत चित्रात रूपांतर करतात. आणि आपल्याला त्या वस्तूच्या रूपाचे ज्ञान होते. ही प्रक्रिया अत्यंत जटील आहे आणि विज्ञानालाही ही प्रक्रिया कशी घडते याचा संपूर्ण शोध लागलेला नाही.
परंतु यातही एक गमतीचा भाग असा, की डोळे प्रतिक्षणी खूप माहिती मेंदूकडे पाठवीत असतात. पण ही सर्व माहिती गोळा करण्याची मेंदूची क्षमता नाही. या माहितीपैकी कोणती माहिती घ्यायची हे मेंदू ठरवितो. येथे वृत्तिव्याप्तीचा संबंध येतो.
मेंदू अथवा मन एखाद्या गोष्टीबाबतच्या अनुभवांचे अथवा एखाद्या विचारांचे ग्रहण करण्यास सिद्ध झाले असेल तर ते त्या 'वृत्तीने व्याप्त झाले आहे' असे अद्वैत वेदांत मानते.  एखादे पाण्याने भरलेले पात्र आपण पहात असू तर आपले मन  'पात्रवृत्ती'ने भरले आहे असे म्हणता येईल. एखादा विद्यार्थी वर्गात उपस्थित असतो, पण मन भरकटल्याने त्याचे शिक्षक काय बोलत आहे याकडे लक्ष नसते. हे त्या विषयाच्या ठिकाणी वृत्तिव्याप्ती नसल्याचे उदाहरण आहे.  एखाद्या वस्तूचे / विचाराचे ज्ञान होण्यासाठी त्या वस्तूची / विचाराची 'वृत्तिव्याप्ती' असणे आवश्यक आहे.
एखादी गोष्ट मेंदूपर्यंत ज्ञानतंतूंद्वारे (नर्व्हजच्या साहाय्याने) पोचल्यावर वृत्तिव्याप्तीअसेल तर मेंदू ती  माहिती स्वीकारतो आणि यानंतर त्या माहितीचे पृथ:करण चालू होते. ही मिळालेली माहिती आधीच्या ज्ञानाशी कोठे मिळते का याची चाचपणी होते. त्यानुसार मेंदू पुढील सूचना देतो. या प्रक्रियेला 'फलव्याप्ती' असे नाव आहे.
पुढील लेखात आपण या वृत्तिव्याप्ती आणि फलव्याप्तीसंबंधी अधिक माहिती घेऊ.  

No comments:

Post a Comment