Friday, October 18, 2019

वेदांत

आपण गेले काही महिने वेदांताचा अभ्यास करीत आहोत.
वेदांताची मध्यवर्ती भूमिका ही 'को अहं ?' अथवा "मी कोण आहे?' या प्रश्नाचा शोध घेण्याची आहे.  "मी कोण" याचा शोध घेणे हा काही रिकामपणाचा उद्योग नाही. आपल्याला दैनंदिन आयुष्यात जे मानसिक अस्वास्थ्य अनुभवास येते, जी दु:खे सहन करावी लागतात त्याचे मूलभूत कारण "मी कोण आहे" याचा शोध न लागणे हे आहे असे वेदांत मानते.  आपण स्वत:ला आपले शरीर किंवा फार तर आपले मन समजतो. या
मुळे आपण स्वतः:ला या शरीरात बद्ध करून घेतो. आपल्या दु:खाचे, अस्वस्थतेचे कारण ही बंधनाची जाणीव आहे. 
आपण आपल्याला आपले शरीर अथवा मन समजतो याचे कारण आपल्याला आपल्यात असलेल्या चैतन्याचा अनुभव आपल्या शरीराच्या मर्यादांपर्यंत सीमित असतो. त्यामुळे साहजिकच आपण आपल्याला आपले शरीर समजतो. आपले मन या चैतन्याशी एकरूप झालेले असल्याने आपण कधीकधी आपल्याला आपले मन समजतो. परंतु आपल्या मनाला आपल्या शरीरापर्यंतच सत्ता गाजविता येते. त्यामुळे स्वत:ला आपले मन समजणे हे ही आपल्याला एका मर्यादेत जखडणे असते. 
वेदान्ताचे प्रतिपादन आहे (आणि खोलात गेल्यावर आपल्याला त्याचा अनुभव येतो) की आपण आपल्या शरीर अथवा मनापुरते मर्यादित नाही. आपले चैतन्य हे चैतन्याचा महासागर पसरलेला आहे त्याचाच एक भाग आहे. किंबहुना चैतन्याचा स्रोत (ज्याला वेदांत बह्म या नावाने संबोधते) तळपत असतो.  या स्रोतातून सातत्याने पाझरणाऱ्या चैतन्यसोबत आपले मन एकरूप होते. आपल्या मनाच्या साहाय्याने हे चैतन्य आपल्या शरीराच्या मर्यादांपर्यंत पसरते. आपल्या ज्ञानेंद्रियांना चेतना देते. म्हणजेच आपण हे आपला देह अथवा मन नसून हा चैतन्याचा स्रोत म्हणजेच ब्रह्म आहोत. 
मग आपल्या या ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान आपल्याला का होत नाही? आपली ज्ञानेंद्रिये सातत्याने आपल्या शरीराच्या बाहेरील अनुभवात गुंतलेली असतात. आपल्या मनाच्या आरशात पडलेल्या चैतन्याचे प्रक्षेपण सातत्याने शरीराच्या बाहेर करीत असतात. जर या चैतन्याचे प्रक्षेपण आपल्याच शरीरात अथवा ब्रह्माच्या विचारात केले तर ब्रह्मज्ञान होऊ शकते.  ध्यानाच्या विविध पद्धतीत चैतन्याचे प्रक्षेपण आपल्याच शरीरात/मनात होते.
गौतम बुद्धाने विकसित केलेल्या विपश्यना ध्यान पद्धतीत आपल्याच शरीराचा वेध घ्यायचा असतो.  गोएंका गुरुजींच्या विपश्यना शिबिरात (http://www.dhamma.org) ही ध्यान पद्धती टप्प्याटप्प्याने शिकविली जाते.  गौतम बुद्धाला  "को अहं" या प्रश्नाचे उत्तर वेदान्ताच्या उत्तरापेक्षा वेगळे मिळाले. पण गौतम बुद्धाची ध्यानपद्धती ही वेदांच्या ध्यानपद्धतीशी मिळतीजुळती होती. गौतम बुद्ध हे भारतीय परंपरेतूनच आलेले होते.
वेदांताचा आपण अधिक खोलात शिरून अभ्यास करणार आहोत. 

No comments:

Post a Comment