Sunday, March 21, 2021

असङ्गो अहम् | भाग ७ : उपसंहार

 आपण अद्वैत वेदान्तातील 'साक्षी', 'उपाधी', 'अधिष्ठान' आणि 'विवर्त' या महत्वाच्या संकल्पना जाणून घेतल्या.  

प्रकाश आणि चित्रपटाचा पडदा यात मूलभूत फरक आहे. प्रकाश वस्तूंचे अस्तित्व दाखवितो. चित्रपटाचा पडदा त्या चित्रपटाला अस्तित्व देतो.  पडदा नसेल तर चित्रपट दिसणार नाही. अस्तित्वात असलेल्या कोऱ्या  पडद्याच्या पार्श्वभूमीवर आपण आभासी स्वरूप असलेला चित्रपट पाहू शकतो. आपले चैतन्य - जे ब्रह्म म्हणूनही ओळखले जाते- ते असेच अस्तित्वात आहे आणि त्याच्या कोऱ्या पडद्यावरच आसपासचे विश्व दृश्यमान होते. आपल्या अस्तित्वाच्या आधारेच हे विश्व उभे राहिले आहे. माझे चैतन्य हे या विश्वाचे आधिष्ठान आहे. एवढेच नव्हे तर माझे शरीर-मन आणि आसपासचे विश्व हे माझ्या चैतन्याचे विवर्त आहे. म्हणूनच मी - माझे अस्तित्व या चित्रपटाच्या पडद्यासारखेच 'असंग' - 'निर्लेप' आहे. माझ्या आसपास घडणाऱ्या घटना, येणारी-जाणारी माणसे, मनात येणारे आणि जाणारे विचार, सुखदुःखाची भावना  हे केवळ माझ्या अस्तित्वाच्या आधारावर आले आणि गेले. माझ्यावर म्हणजेच माझ्या चैतन्यावर- माझ्या अस्तित्वावर त्याने कोणताही परिणाम झाला नाही आणि होणारही नाही. 

एकदा ही गोष्ट लक्षात आली की आपण तणावहीन होतो. जगातील कोणत्याही समस्या आपल्यापुढे आल्या तरी तणावग्रस्त न होता त्या सोडविण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. तणावग्रस्त न होता एखाद्या समस्येला तोंड दिले तर त्या समस्येतून सुटण्याचे मार्गही दिसू लागतात. अध्यात्मातील 'असंग' होण्याची कल्पना म्हणजे दैनंदिन जीवनातील समस्यांपासून दूर पळणे नव्हे तर या समस्यांना शांतपणे सामोरे जाणे आहे. या समस्या कदाचित सुटतील अथवा सुटणारही नाहीत, परंतु या समस्या तुमच्यावर म्हणजेच तुमच्या चैतन्यावर एकही ओरखडा उमटवू शकत नाहीत. या समस्यांच्यावेळी मनावर येणार ताण साक्षीभावाने अनुभवा, शारीरिक वेदना साक्षीभावाने अनुभवा. मनावरील ताण, शारीरिक वेदना यांचा त्रास कमी होऊ लागेल. हीच 'असंग' होण्याची प्रक्रिया आहे. 

'असंग' होण्याची ही प्रक्रिया सोपी आहे. निदान आपण सुरुवात तर निश्चित करू शकतो. मात्र त्यासाठी या लेखाच्या सुरुवातीस सांगितलेल्या चार संकल्पना नीट समजून घेतल्या पाहिजेत. 

'असंग' होण्याच्या प्रवासात तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

लेखमाला समाप्त 


No comments:

Post a Comment