Tuesday, November 21, 2023

वृत्ती

 या पूर्वी आपण साक्षी, विवर्त, उपाधी आणि अधिष्ठान या अद्वैत वेदांतातील चार महत्वाच्या संकल्पनांसंबंधी माहिती घेतली. या चार संकल्पनांवर अद्वैत तत्वज्ञानाची उभारणी झालेली आहे असे म्हणता येईल. आता आपण भारतीय तत्वज्ञानातील अन्य एका संकल्पनेची माहिती करून घेऊ.

'वृत्ती' हा शब्द मराठी भाषेत रुजला आहे. त्याचा मूळ अर्थ आता आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला आपल्या मेंदूची कार्यपद्धती बघावी लागेल. मेंदूत अनेक पेशी असतात. त्यांना चेतापेशी म्हणतात. त्यातून चेतातंतू शरीराच्या भागात गेले असतात. हे चेतातंतू सतत मोठ्या प्रमाणात माहिती मेंदूकडे आणत असतात. या माहितीचे पृथकारण करून ती माहिती योग्य ठिकाणी साठविण्याचे काम मेंदू करत करत असतो. याच वेळी मेंदूत साठविलेल्या प्रचंड माहितीतील योग्य माहितीतील माहितीचे पृथकारण करून योग्य त्या अवयवांना कृती करण्याचे आदेश देण्याचे कामही मेंदू करत असतो. या सगळ्यासाठी मेंदूला खूप मोठी Processing Capacity ची आवश्यकता असते. परंतु मेंदूची Processing Capacity केवळ १२० bits/second एवढीच आहे.
याचाच अर्थ मेंदूकडे येणाऱ्या सगळ्या माहितीचे पृथकारण मेंदू करू शकत नाही. त्यातही आधी साठविलेल्या माहितीचे पुनराविलोकन (Retrival) मेंदू करत असेल तर सर्व अवयवांकडून आलेल्या फारच थोड्या माहितीचे पृथकारण होऊ शकते. अशावेळी मेंदू कोठल्या अवयवांकडून येणाऱ्या माहितीचे पृथकारण करायचे याचा निर्णय घेतो. यालाच त्या विषयीची वृत्ती आपल्या मनात जागृत झाली असे म्हणतात.
मी शाळेत वर्गात बसलो आहे. शिक्षक शिकवीत आहेत. मला तो विषय शिकण्याची इच्छा जागृत झाली तर त्या विषयाच्या वृत्तीने माझे मन व्याप्त झाले असे म्हणता येईल. मग माझ्या डोळ्यांकडून आणि कानांकडून हेणाऱ्या संदेशांचे मेंदू ग्रहण करून पृथकारण करेल आणि मला तो विषय समजेल. एखाद्या विषयाचे ज्ञान होण्यासाठी त्या विषयाची वृत्ती मनात जागणे आवश्यक आहे.
एखादी अंधारी खोली आहे. त्यातील एका कोपऱ्याचे ज्ञान करून घ्यायचे आहे. खोलीच्या खिडकीत ऊन येत आहे. आपण एक आरसा घेऊन त्याचा कवडसा त्या खोलीच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यात पाडून त्या कोपऱ्याचे ज्ञान मिळवू शकतो. आपल्याला हव्या त्या जागी तो कवडसा फिरवून ज्ञान घेता येईल. मात्र तो आरसा लहान असल्याने एकाच वेळी खोली उजळू शकणार नाही.
चैतन्याचा सूर्य आकाशात तळपत आहे. आपल्या मनाच्या आरशाच्या साहाय्याने चैतन्याचा कवडसा एखाद्या गोष्टीवर टाकून हवे ते ज्ञान मिळवू शकतो. मात्र आपल्याला सूर्याचे ज्ञान हवे असेल तर मनाच्या आरशाने सूर्यावर कवडसा पाडण्याची गरज नाही. सूर्य स्वयंप्रकाशित आहे. तसेच चैतन्य स्वयंप्रकाशित आहे. प्रत्येक क्षणी आपल्याला चैतन्याची जाणीव असते. त्याच्या साहाय्यानेच आपण ज्ञानप्राप्ती करून घेत असतो. त्यासाठी चैतन्याची वृत्ती जगविण्याची गरज नाही.
चैतन्यमय जीवनासाठी शुभेच्छा.
संतोष कारखानीस ठाणे

No comments:

Post a Comment