Wednesday, May 9, 2018

बौद्धदर्शन

बौद्धदर्शन हे अनेक अंगांनी विस्तारले आहे. भारतातून बुद्धधर्म अनेक देशांत पसरला. त्यामुळे बौद्धदर्शनात अनेक प्रवाह येऊन मिसळले. आपण विस्तारभयापोटी गौतम बुद्धाने प्रतिपादित केलेल्या दर्शनाचाच विचार करणार आहोत.
राजपुत्र सिद्धार्थ याला त्याच्या वडिलांनी अत्यंत सुखात ठेवले. दु:खाचा स्पर्शही होणार नाही याची काळजी घेतली. पण यथावकाश त्याला वार्धक्य, रोग, मृत्यू याची माहिती झालीच. यामुळे त्याचे हृदय पिळवटून गेले. संपूर्ण बौद्धदर्शनावर या प्रसंगाची छाया स्पष्टपणे जाणवते.  दु:खाचे निराकरण करण्याचा मार्ग शोधण्यासाठी सिद्धार्थाने गृहत्याग केला.
बुद्धाच्या महानिर्वाणानंतर सुमारे शंभर वर्षांनी एक धर्मसभा (संगती) बोलाविण्यात आली. यात बुद्धाच्या जवळच्या लोकांच्या आठवणीत असलेली वचने शब्दबद्ध करण्यात आली. ही वचने तीन पेट्या अथवा टोपल्यांमध्ये जतन करण्यात आली. त्याला त्रिपिटक असे म्हणतात. या संगतीनंतर बुद्ध धर्मात दोन तट पडले. एका गटाच्या म्हणण्यानुसार बुद्धाची शिकवण जशीच्या तशी पाळणे आवश्यक आहे. या गटाला 'थेरवादी' असे नाव मिळाले. दुसरा गट स्थानिक संस्कृती आणि गरजा यांच्याशी बुद्ध शिकवणुकीचा मेळ घालावा या मताचा होता. त्यांच्या पंथाला 'महायान' अशी संज्ञा मिळाली. महायानपंथीय बुद्धमूर्तीची पूजाअर्चा करू लागले. काही प्राचीन बौद्ध स्तुपांमध्ये बुद्धाची मूर्ती दिसते तर काही स्तूपात सभागृहासमोर केवळ स्तूप दिसतो. याचे कारण काही लेणी थेरवादी बुद्धांची तर काही महायानवादी बुद्धांची आहेत. स्थानिक संस्कृतीशी मेळ घालण्याच्या सुविधेमुळे महायानपंथ अनेक देशांत पसरला. थेरवादीपंथ श्रीलंका, म्यानमार, कंबोडिया आदी भारताच्या शेजारी देशांमध्ये पसरला.
आपण पुढील लेखात बौद्ध दर्शनाचा विचार विस्ताराने करू.

No comments:

Post a Comment