Sunday, May 13, 2018

बौद्ध दर्शन : प्रतीत्यसमुत्पाद

प्रतीत्यसमुत्पाद किंवा द्वादश-निदान ही गौतम बुद्धाची सर्वात मोठी उपलब्धी आहे असे त्याचे मत होते.  आपण हा प्रतीत्यसमुत्पाद सध्याच्या भाषेत समजून घेऊ.
माणसाचे मन खूप मोठे असते. आपल्याला जाणविणाऱ्या मनाच्या भागाला आपण बहिर्मन म्हणतो. त्यापलीकडे खूप मोठे अंतर्मन असते. काही बाह्यगोष्टींमुळे ही अंतर्मनातील खळबळ बाह्य मनावर येऊ शकते. त्यामुळे आपण अस्वस्थ होतो हे आपण सगळे जाणतो.
अंतर्मनात आपले पूर्वीचे बरे-वाईट अनुभव (बुद्धाच्या भाषेत 'संस्कार') एकत्र साठविलेले असतात. एखाद्या बाह्य गोष्टीचा स्पर्श आपल्या पंचेन्द्रीयांपैकी एकाला होतो अथवा मनात एखादा विचार येतो. पंचेंद्रिये ही केवळ एखाद्या उपकारणासारखी असतात. ज्याचा स्पर्श  झाला (दिसणे, ऐकणे, चव, स्पर्श, गंध, विचार इ.)  ती गोष्ट ही इंद्रिये निरपेक्षपाने मेंदूला पोचवितात. पुढच्या क्षणी मेंदूचा एक हिस्सा जागृत होतो आणि या आलेल्या अनुभवाचे परीक्षण करतो. आलेल्या अनुभवासारखा (स्पर्श, चव इत्यादी) अनुभव पूर्वी कधी आला होता काय हे स्मृतीतून शोधतो. हा पूर्वीचा अनुभव चांगला असेल तर शरीरावर सुखद संवेदना निर्माण करतो. जर पूर्वीचा अनुभव वाईट असेल तर शरीरावर दु:खद संवेदना निर्माण होतात. या सुखद अथवा दु:खद संवेदनांना आपण प्रतिसाद देतो. सुखद संवेदना परत परत अनुभवाव्याश्या वाटतात. दु:खद संवेदानांपासून आपण दूर पळतो. अशी संवेदना परत अनुभवण्यास लागू नये असे वाटते (बुद्धाच्या भाषेत 'तृष्णा').  परत आपला प्रतिसाद परत अंतर्मनात जातो. आपला प्रतिसाद किती तीव्र होता यावर अंतर्मनात हा प्रतिसाद किती खोलवर जाईल आणि किती काल तसाच राहील हे ठरते. ही क्रिया वारंवार घडल्याने अंतर्मनात या अनुभवाबद्दलचा प्रतिसाद तीव्र रूप घेतो आणि आपल्याला प्रत्येकवेळी अधिकाधिक अस्वस्थ करतो. मृत्युच्या वेळी यातील एखादी तीव्र इच्छा डोके वर काढते. हीच इच्छा हा संस्कारांचा पुंज घेऊन नव्या शरीराला चिकटते आणि पुनर्जन्म होतो (भव).
माणूस या भावाचाक्रात असाच असहाय्यपणे फिरत रहाणार काय हा प्रश्न बुद्धाला पडला. पण ही साखळी तोडण्याचा एक मार्ग त्याला दिसला. शरीरावर सुखद अथवा दु:खद संवेदना निर्माण झाल्यावर त्याला प्रतिसाद न देणे, त्या परत परत अनुभवण्याची अथवा कधीच न अनुभवण्याची इच्छा मनात येऊ न देणे. यामुळे मनातील 'संस्कार' बहिर्मानावर येऊन नष्ट होतील (निर्जरा होतात), त्यांना बळ मिळून ते परत अंतर्मनात जाणार नाहीत. हळू हळू अंतर्मनातील सर्वच संस्कारांची निर्जरा होईल. याला बौद्ध भाषेत 'निर्वाण' म्हणतात. मग मृत्यूच्यावेळी कोणतीच इच्छा डोके वर काढणार नाही, संस्कारांचा पुंज शून्य झालेला असेल. अशावेळी काहीच उरणार नाही. आत्मा सदृश काहीही नसेल. शून्य शून्यात विलीन होईल.
शरीरावर सुखद अथवा दु:खद संवेदना निर्माण झाल्यावर त्याला प्रतिसाद न देण्याची कला म्हणजे ध्यान होय.
ध्यानात खोलवर गेल्यावर या सुखद अथवा दु:खद संवेदनाची जाणीव स्पष्टपणे होऊ लागते. आपण प्रतिसाद न दिल्याने त्याची निर्जरा कशी होते हेही जाणवते. विपश्यनेचा संपूर्ण मार्ग हा स्वानुभवाचा मार्ग आहे. प्रतीत्यसमुत्पाद ही कल्पनेतील गोष्ट नाही हे जाणवते.
आधुनिक शास्त्रही सांगते की अंतर्मनातील गोष्टी बहिर्मानावर येऊ लागल्या की आपल्याला मोकळे वाटू लागते. प्रतीत्यसमुत्पाद हीच गोष्ट वेगळ्या भाषेत सांगतो आणि मन मोकळे करण्यासाठी ध्यान हे एक साधनही आपल्या हाती देतो.
पुढील लेखात बुद्धाने सांगितलेली दहा अव्याकृते पाहू.

No comments:

Post a Comment