Sunday, May 6, 2018

दर्शनशास्त्र : प्रस्तावना

दर्शनशास्त्र हे निसर्गनियमांचा अभ्यास करून परम सत्याचा शोध घेण्याचे शास्त्र आहे. अर्थातच दर्शनशास्त्र आपणास आलेल्या/येत असलेल्या अनुभवांचे एका विशिष्ट पद्धतीने विश्लेषण करणे आणि त्यातून काही निष्कर्षाप्रत येणे याची कला आहे. प्रत्येकाचे अनुभवाचे क्षेत्र वेगळे असते, तसेच या अनुभवांचे विश्लेषण करण्याच्या पद्धतीही भिन्न असू शकतात. अनुभवांचे विश्लेषण करताना काही गोष्टी गृहीत धराव्या लागतात, विश्लेषणाचे काही नियम मान्य करूनच पुढे जावे लागते. या भिन्नतेमुळेच येथे अनेक दर्शनशास्त्रे विकसित झाली. ही दर्शशास्त्रे विकसित होताना अनेक ऋषींनी त्यात योगदान दिले. यामुळे त्यांचा विकास झाला आणि अनुभव/नियमांना स्पष्टता आली. हळूहळू काही दर्शनशास्त्रे परिपूर्ण होत गेली आणि प्रमुख दर्शनशास्त्रे म्हणून मान्यता पावली.
Image result for ऋषिमागील लेखात म्हटल्याप्रमाणे आठ दर्शने महत्वाची मानली जातात. सांख्य, वैशेषिक, न्याय, चार्वाक (लोकायत), पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, बौद्ध आणि जैन ही ती आठ दर्शने होत. आजचे भारतीय मानस सांख्य दर्शनावर (ज्यावर भगवतगीता आधारलेली आहे) पोसलेले आहे. याशिवाय आद्य शंकराचार्यांचे उत्तमीमांसा (वेदांत दर्शन) हे ही भारतीयांवर प्रभाव टाकते.
काहीजण लोकायतदर्शन हे महत्वाचे न मानता आठ दर्शनांत योगदर्शनाला स्थान देतात. पण दर्शनाच्या 'प्रमाण' वगैरे अंगांचा विकास योगात दिसत नाही. म्हणून बहुसंख्य अभ्यासक 'योग' हे स्वतंत्र दर्शन मानत नाहीत. योग हा 'सांख्यदर्शनातून' विकसित झाले आहे असे मानतात.
दर्शनशास्त्र आणि इंग्रजी Philosophy हे शब्द समानार्थी नाहीत. दर्शनशास्त्र हे मानवी चेतनेचा वेध घेते, चेतनेचा अभ्यास करते. Philosophy मध्ये याचा अंतर्भाव नाही. सर्व दर्शनांचे उद्दिष्ट मानवाच्या चेतनेचा वेध घेत मानवी जीवनातून दु:ख नष्ट करणे आहे. प्राचीन ऋषींना भौतिक संपत्तीतून सुख मिळतेच असे नाही याची जाणीव झाली. म्हणूनच मानवी चेतनेच्या डोहात खोलवर शिरून मानवी जीवनाच्या सुखाचा त्यांनी शोध घेतला. यातूनच दर्शनशास्त्राचा जन्म झाला.
दर्शनशास्त्रात 'प्रमाण' या गोष्टीला खूप महत्व आहे. एखादीगोष्ट योग्य आहे अथवा नाही हे प्रमाणावरून ठरविले जाते. दर्शनशास्त्रात अशी अनेक प्रमाणे आहेत. प्रत्येक दर्शनशास्त्र यातील कोणती प्रमाणे त्यांना मान्य आहेत हे सांगते.
'वेदांत सांगितले तेच खरे' असे 'शब्दप्रमाण' मानते. जर एखादी गोष्ट वेदात सांगितली असेल तर अन्य काही शहानिशा करण्याची गरज नाही असा त्याचा अर्थ आहे. 'शब्दप्रमाण' मानणाऱ्या दर्शनास भारतीय दर्शनशास्त्राप्रमाणे 'आस्तिक दर्शन' म्हणून संबोधले जाते. याचा देव आहे अथवा नाही असे मानण्याशी काहीही संबंध नाही. आठ प्रमुख दर्शनांपैकी केवळ उत्तरमीमांसा (वेदांत) हेच दर्शन या व्याख्येप्रमाणे आस्तिक दर्शन आहे.  बाकी सर्व दर्शने 'नास्तिक दर्शने' आहेत.

No comments:

Post a Comment