Tuesday, May 15, 2018

चार्वाक दर्शन

जैन दर्शन आणि बौद्ध दर्शन ही 'नास्तिक' दर्शने आपण पाहिली. 'वेदप्रामाण्य नाकारणारी' या अर्थानेच ती दर्शने नास्तिक आहेत. परंतु 'चार्वाक दर्शन' हे त्यापेक्षा पूर्णांशाने निराळे आहे. ते सध्याच्या अर्थानेही खरे 'नास्तिक' दर्शन आहे.
चार्वाक दर्शनाचे मंडन करणारा एकाही स्वतंत्र ग्रंथ दुर्दैवाने उपलब्ध नाही. विरोधकांनी लिहिलेल्या संकलन ग्रंथातून आणि विरोधकांनी लिहिलेल्या ग्रंथातील पूर्वपक्षातूनच आपल्याला हे दर्शन समजून घ्यावे लागते.
या दर्शनाचा आद्यप्रवर्तक बृहस्पती (देवगुरु?) आहे असे मानतात. म्हणून या दर्शनाला 'ब्राहास्पत्य दर्शन' असेही म्हणतात. 'लोकायत' असेही या दर्शनाचे नाव आहे. इसवीसनाच्या आठव्या शतकापासून मात्र हे दर्शन 'चार्वाक दर्शन' म्हणूनच ओळखले जाऊ लागले.
इतर कोणत्याही दर्शनाप्रमाणे चार्वाक दर्शनाची उभारणी प्रमाण मतांवर झाली आहे. कोणती प्रमाणे मानायची आणि कोणती ताजी ठरवायची हे ठरविल्यावर आपोआपच पुढील सिद्धांतांची मांडणी करता येते. चार्वाक 'प्रत्यक्ष' हे एकमेव प्रमाण मानतो. शब्द (वेद, पुराणे) इत्यादी अथवा अनुमान हे प्रमाण मानण्याचे त्यांनी नाकारले.
अनुमान म्हणजे ज्ञाताच्या आधारावर अज्ञातापर्यंत पोचविणारी मानसिक क्रिया. 'सगळ्या गाढवांचे कान लांब आहेत म्हणून गोऱ्या कुंभाराच्या गाढवाचे कान लांब आहेत' हे अनुमान झाले. पण सर्व गाढवांचे कान लांब आहेत हे कसे ठरविले? जर सर्व गाढवांचे कान लांब आहेत हे सर्व गाढवे पाहून ठरविले असेल तर गोऱ्या कुंभाराच्या गाढवाचे कानही पहिले आहेत. म्हणजेच जे आधीच सिद्ध आहे ते परत सिद्ध करण्याचा हा खटाटोप आहे. काही गाढवे पाहूनच सर्व गाढवान्साम्बंधी विधान केले तर त्याची सत्यता शंकास्पद राहील. म्हणून अनुमान चार्वाकाना मान्य नाही.
पण अनुमानाशिवाय आपल्याला जगातच येणार नाही. त्यामुळे चार्वाकांवर खूप टीका झाली. शेवटी काही चार्वकांनी यावर मार्ग काढून नेहमीच्या जीवनात लागणाऱ्या गोष्टींसाठी अनुमान स्वीकारले. पण लोकोत्तर गोष्टींसाठी (या इन्द्रियांच्या  अनुभवपलीकडे असलेल्या) गोष्टींसाठी अनुमान वापरण्याचे नाकारले. त्यामुळे चार्वाक आत्मा, परलोक, पाप, पुण्य, कर्म इत्यादी काहीच मानीत नाहीत.
आत्मा आणि कर्मवाद नाकारून चार्वाकांनी ऐहीकवाद स्वीकारला. या जीवनात जी जी सुखे शक्य आहेत ती उपभोगावी आणि आनंदात राहावे असे सांगितले. सुखाशी दु:ख हे संलग्न असतेच, म्हणून दु:खाला घाबरून सुखाकडे पाठ फिरविणे योग्य नाही अशी त्यांची भूमिका होती. (बुद्धाने नंतर याच्या बरोबर उलट भूमिका मांडली). या भूमिकेमुळे चार्वाकांवर अतिरेकी सुखावादाचा आरोप केला गेला.
यावज्जीवं सुखम् जीवेत् ऋणम् कृत्वा घृतम् पिबेत् |
असे चार्वाकांचे म्हणणे असल्याचे सांगितले गेले. पण हा त्यांच्यावर अन्याय आहे. 'सर्वसिद्धांतसंग्रह' या ग्रंथात स्पष्ट उल्लेख आहे की चार्वाकांच्या मते शहाण्या, जाणत्या माणसाने शेती, गोपालन, व्यापार, शासनव्यवस्था या सारख्या दृष्ट असलेल्या 'सत्' उपायांनी पृथ्वीवरील भोग उपभोगावेत.
अग्निहोत्र, वेदापठाण इत्यादींचे स्तोम माजवून पौरोहीत्यादी उपायांनी उपजीविका करणार्यांची त्यांनी निंदा केली आहे. त्यांची गणना 'भंड-धूर्त-निशाचारांत' केली आहे.
म्हणजेच चार्वाकांना एक नीतिशास्त्र होते. त्यांनी प्राण्यांना मारून त्याचे मांस खाण्याचीही निंदा केली आहे. अर्थात नीती-अनीती या इंद्रिय संवेदना नाहीत. त्यामुळे त्यांचे नीतिशास्त्र कोणत्या आधारावर बेतले होते याचा पत्ता लागत नाही.
या नंतर आपण 'वैशेषिक दर्शनाचा' विचार करू.

2 comments:

  1. पण 4 महाभूते जेव्हा एकत्र येतात तेव्हा चैतन्य निर्माण होते आणि त्यातून सृजन होते हे चार्वाक यांना मेनी होते ना?

    ReplyDelete