Sunday, May 6, 2018

परस्परावलंबन

भारतीय तत्वज्ञान ही एकसंघ, एकरंगी वस्तू नाही, तर हे तत्वज्ञान अनेक अंगांनी फुलत गेलेले आहे. येथे अनेक दर्शने विकसित झाली. ही दर्शने स्वतंत्रपणे एका हवाबंद कप्प्यात विकसित न होता एकाचवेळी हातात हात घालून विकसित झालेली आहेत. अन्य देशांत एखादा तत्ववेत्ता होऊन एखादे तत्वज्ञान विकसित करतो. त्याच्यानंतर अनेक वर्षांनी अन्य कोणी तत्ववेत्ता येऊन आधीच्या तत्वज्ञानातील उणीवा दाखवितो आणि नवे तत्वज्ञान जन्माला घालतो. येथेमात्र सर्व तत्वज्ञाने एकमेकांवर आघात-प्रत्याघात करीत एकाचवेळी विकसित होत होती. कोठल्याही तत्वज्ञानाचा उच्छेद झाला नाही.
कोणत्याही दर्शनाची मांडणी करताना प्रथम अन्य दर्शनाच्या मताचा परामर्श घेतला जातो. कोणी त्या दर्शनाच्या मताच्या विरोधात नवा युक्तिवाद मांडल्यास त्या दर्शनाचे पुढील भाष्यकार आपली मूळची भूमिका न सोडता या विरोधी युक्तिवादाचे खंडन करण्यास काही उत्तर शोधून काढतात आणि आपले दर्शन अधिक निर्दोष बनवितात. विविध दर्शनाच्या भाष्यकारांच्या होणाऱ्या वादविवादामुळे या सर्वच दर्शनांची वाढच झाली, एकमेकांच्या वाढीला ही विविध दर्शने उपकारक ठरली.
याचाच परिणाम म्हणू येथे आपले मत मांडण्याची पूर्वपक्ष-उत्तरपक्ष पद्धती रूढ झाली. या पद्धतीत प्रतिस्पर्धी दर्शनाची भूमिका प्रथम विस्ताराने मंडळी जाते आणि मग तिचे खंडन केले जाते. विशेष म्हणजे कोणीही प्रतिपक्षाचे मत विकृत करून मांडलेले नाही. प्रतिपक्षाच्या मताला योग्य मान देऊनच त्याचे खंडन केले जात असे. अनेकदा असे घडले आहे की प्रतिपक्षाहून अधिक चांगल्या पद्धतीने त्या पक्षाचे मत पुर्वपक्षात मांडले जाते. उदा. रामाजुनाचार्य यांनी आपल्या 'श्री भाष्यात' शंकराचार्य यांच्या मताची सुंदर मांडणी केली आहे.
सध्या आपल्या देशात प्रतिपक्षाचे मत विकृत करून मग त्यावर टीका केली जाते. या पार्श्वभूमीवर आपली प्राचीन परंपरा किती उज्ज्वल होती हे लक्षात येते.

No comments:

Post a Comment