Saturday, May 19, 2018

पूर्वमीमांसा दर्शन

पूर्वमीमांसा दर्शन हे 'मीमांसा' या नावानेही ओळखले जाते. मीमांसासूत्रे रचणारा जैमिनी याचा काल इसवीसनाचे पहिले शतक आहे. इ.स.पूर्व ५६३ यावर्षी जन्मलेल्या बुद्धाच्या बुद्धदर्शनाने संपूर्ण भारतावर मोहिनी घातली होती. यावेळी वेदवाङ्मयावर श्रद्धा असलेले चिंताक्रांत झाले. अजूनही समाजाची वेदवाङ्मयावर काही प्रमाणात श्रद्धा शिल्लक होती. या श्रद्धेला प्रामाण्यआधार मिळवून देण्याचा मीमांसाकारांचा प्रयत्न दिसतो.
वेदांच्या कर्मकांडातील, म्हणजे संहिता आणि ब्राह्मणे यातील वचनांचा समन्वय करणारे जे शास्त्र आहे त्यास पूर्वमीमांसा (अथवा नुसते मीमांसा) म्हणतात. तर वेदांचा तत्वज्ञानविषयक भाग, म्हणजे प्रामुख्याने उपनिषदे यांचा समन्वय करणारे जे शास्त्र आहे त्यास उत्तरमीमांसा (अथवा वेदांत) म्हणतात. या लेखात आपण पूर्वमीमांसा अथवा मीमांसा या दर्शनासंबंधी माहिती घेणार आहोत.
वेदवाङ्मयातील अतिप्राचीन भाग हा देवतांची स्तुती करण्याचा, त्याची स्तुती असलेला आहे. त्यांची स्तुती करून, त्याना यज्ञात हवन देऊन त्यांच्यामार्फत आपली दु:खे, व्याधी कमी करावीत असा हा प्रयत्न आहे. (नंतरच्या काळात होमहवन आणि मंत्रांना अतिरिक्त महत्व येऊन देवतांचे महत्व कमी झाले) या साठी यज्ञविधी कसा करावा याचे विस्तृत वर्णन वेदांच्या ऋचात आहे. परंतु हे वर्णन निरनिराळ्या काळात तसेच निरनिराळ्या वेद, स्मृती, श्रुतींमध्ये आहे आणि काहीवेळा त्यातील विधाने परस्पर विरोधी आहेत, काही विधानांची एकमेकांशी संगती लागत नाही. अशावेळी या विधानांत सुसंगती आणणे हाही मीमांसाकारांचा प्रयत्न दिसतो.
यज्ञयागाचे तात्त्विक समर्थन करणे हाही मीमांसाकारांचा प्रयत्न राहिला आहे. मरणानंतर आत्म्याचे काय होते, परलोक, कर्म, कर्मफळ इत्यादींबद्दल मीमांसक माहिती देतात.
मिमंसेची मूळ वृत्ती तत्वज्ञानपार नाही. जैमिनीचे पहिलेच सूत्र 'अथतो धर्मजिज्ञासा' आहे. येथे 'धर्म' याचा अर्थ 'इष्ट आणि अलौकिक फळे देणारी यज्ञयाग इत्यादी कर्मे' हा आहे.
मीमांसकांच्या मते वेद हे मनुष्याने अथवा ईश्वराने निर्माण केलेले नाहीत, ते अपौरुषेय म्हणजेच नित्य आहेत. त्यांच्यामते धर्मासंबंधी वेद हेच परम प्रमाण आहेत.  इतर कोठल्याही प्रमाण स्मृतीतील वचनाच्या विरोधात जात असेल तर स्मृतीत लिहिलेलेच सत्य समजावे. स्मृतीने न सांगितलेला एखादा विधी श्रुतीने सांगितलेला असेल तर तो लुप्त स्मृतीतील आहे असे समजून त्याचे पालन करावे. धर्मासंबंधी श्रुती, स्मृती, पुराणे यांना उतरत्या क्रमाने प्राधान्य आहे. 
यज्ञ योग्यप्रकारे सिद्ध झाला आणि त्यातील मंत्रोच्चार योग्य प्रकारे झाले की त्याचे फळ आपोआपच मिळते, देवतांच्या कृपाप्रसादाने मिळत नसते अशी यज्ञविधीसंबंधी टोकाची भूमिका मीमांसकांची आहे. कोणते यज्ञ कधी आणि कसे करावेत, त्यांचे फळ काय आहे हे समजावून सांगणे हेच मीमांसेचे मुख्य काम आहे.
मीमांसक आत्मा मानतात पण ईश्वर मानत नाहीत. ईश्वराला मानण्याने वेदांना गौणत्व येते अशी त्यांची भूमिका आहे. एक ईश्वर मानीत नसले तरी इष्ट फळ देणाऱ्या देवता मानतात. मात्र यज्ञ योग्यप्रकारे केल्यावर देवतांना फळ द्यावेच लागते अशी ही भूमिका आहे.
यज्ञयागादी धर्माचे आचरण स्वर्गसुखासाठी करायचे असे मीमांसक सांगतात. मात्र नंतरचे मीमांसक अन्य दर्शनाच्या प्रभावामुळे 'मोक्षाची कल्पना' स्वीकारू लागले.
उपनिषदात येणारी तत्वज्ञानविषयक चर्चा मीमांसक गौण समजतात.
पुढील लेखात आपण 'उत्तरमीमांसा' अथवा 'वेदांतदर्शन' समजून घेण्याचा प्रयत्न करू.

No comments:

Post a Comment