Friday, May 18, 2018

सांख्यदर्शन

सांख्यदर्शन हे भारतीयांवर सर्वात प्रभाव टाकणारे दर्शन आहे. भगवतगीता सर्वच दर्शनांना सामावून घेणारी असली तरी तिच्यावर सांख्यदर्शनाचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. सांख्यदर्शन भारताच्या पूर्व भागात खूपच प्रभावी आहे. या दर्शनाचा बुद्धधर्माच्या महायान पंथाबरोबर संयोग होऊन ते तिबेट आणि जगाच्या पूर्वेकडे पोचले.
सांख्य दर्शनाचा पहिला प्रवर्तक कपिल ऋषी मनाला गेला आहे. भगवतगीतेतील 'सिद्धानां कपिलो मुनि:'असा आदराने उल्लेख केलेला कपिल मुनी हाच असावा. परंतु कापिल ऋषींचा एकही ग्रंथ उपलब्ध नाही. त्यांनी आपले तत्वज्ञान आपला शिष्य आसुरी याला शिकविले. आसुरीने त्याचा शिष्य पंचशीख याला दिले. पंचशीखाने त्याचा विस्तार केला.  या दर्शनावरील 'माठरवृत्ती' ही टीका सर्वात प्राचीन आहे. तिचे भाषांतर इ.स. ४५० च्या सुमारास चीनी भाषेमध्ये (मँडरीन ??) भाषेमध्ये झाले आहे.
तंत्र, कुंडलिनीविद्या, पातंजलयोग, आयुर्वेद इत्यादी शास्त्रे सांख्यदर्शनातूनच उगम पावली आहेत.
चेतन आणि जड पदार्थ यांचे यथार्थ ज्ञान करून देणे यासाठी सांख्यदर्शन प्रयत्न करीत आहे. त्यांचे प्रमुख सिद्धांत असे
१> पुरुष (म्हणजे व्यवहारात आपण ज्याला आत्मा म्हणतो तो) आणि प्रकृती (आपले शरीर आणि सर्व बाह्य सृष्टी) ही मूलत: दोन भिन्न द्रव्ये आहेत.
२>सृष्टीतील नानाविध वस्तूंचे आणि घडामोडींचे एकमेव आदिकारण 'प्रकृती' आहे. ती 'सात्विक',  'रजस्' आणि 'तमस्' गुणांनी बनलेली आहे. ती 'जड' म्हणजे जाणीव नसलेली आहे.
३> पुरुष चेतन, निर्गुण आणि निष्क्रिय असून अनेक आहेत.
४>पुरुषाने प्रकृपासून आपल्या निराळेपणाचा बोध घेणे म्हणजेच 'कैवल्य' अथवा मोक्ष होय.

प्रकृतीविषयी आणखी काही गोष्टी मानण्यात आलेल्या आहेत.
१> इतर पुरुषांपासून अथवा प्रकृतीपासून स्वत:ला अलग समजण्याचा विवेक (जो पुरुषापाशी आहे) तो प्रकृतीपाशी नाही. ती अविवेकी आहे.
२>ती ज्ञानाचा विषय होते. ज्ञातृत्व तिच्याकडे नाही.
३>सामान्य पदार्थ तिच्यावर राहू शकतो.
४>तिला जाणीव नसते. ती अचेतन आहे.
५>तिचा विकास होतो. ती प्रसवधर्मी आहे. अशांत झालेली त्रिगुणात्मक प्रकृती दृश्य जग निर्माण करते. यापूर्वी तिच्यात अहंकार निर्माण होतो.

सांख्य परिभाषेत मोक्षाला 'कैवल्य' असे नाव आहे. पुरुषाला स्वत:च्या (अन्य पुरुषांपासून आणि प्रकृतीपासून) वेगळे असण्याची जाणीव नसणे (अविवेक) हे बंधनात पडण्याचे कारण आहे. (अद्वैत दर्शनाच्या बरोबर विरोधी असे हे मत आहे : द्वैतभावना हे बंधनात पडण्याचे कारण).

प्रकृतीचे हे सारे सर्जन पुरुषाच्या कैवाल्यासाठीच असते असे सांख्यांचे मत आहे. हा विश्वाचा पसारा प्रकृती मांडते तो पुरुषाच्या भोगाकरता.  पुरुषाच्या भोगातूनच प्रकृतीत सत्वगुण उत्पन्न होतो. हा सत्वगुणच पुरुषामध्ये विवेक उत्पन्न करतो आणि पुरुष कैवल्याप्रत जातो.

सांख्यांनी पुरुषार्थ (कैवल्याप्रत पोचणे) ही अन्तीम प्रेरणा मानली त्यामागे दु:खवाद दिसतो. आयुष्य हे दु:खमय आहे ही भूमिका त्यांनी ठामपणे घेतली.  त्यांची ही भूमिका बुद्धाच्या भूमिकेच्या जवळ जाते. या दु:खातून सुटका मिळविण्यासाठीच कैवल्यप्राप्ती आवश्यक आहे असे त्यांचे म्हणणे होते.

सांख्य दर्शनाने ईश्वर नाकारला आहे. पुरुष-प्रकृती सिद्धांतात त्यांना ईश्वराची गरज वाटली नाही. प्रकृती हे जड विश्व प्रसाविते. त्यात ईश्वराला स्थान नाही.

पुढील लेखात आपण पूर्वमीमांसा दर्शनाचा विचार करू.

No comments:

Post a Comment