Tuesday, May 22, 2018

उपसंहार

मित्रहो, गेले काही दिवस मी भारतीय प्राचीन दर्शनशास्त्रावर लिहित होतो. खरे तर मी यातील अधिकारी व्यक्ती नाही. पण तरीही यावर लिहिण्याचे औधात्य केले. आपण माझे हे औधत्य सहन केलेत. हे औधत्य करण्याला एकाच कारण होते की सध्याची सामाजिक स्थिती पाहून भारताची संस्कृती कशी सर्वसमावेशक आहे याची जाणीव करून द्यावी असे प्रकर्षाने वाटले. आपल्या विरुद्ध मताचे कोणी आहे असे दिसले की फेसबुकवर जी अर्वाच्य भाषा काहीजणांकडून वापरली जाते त्याने मनाला यातना होतात. आपल्या दर्शनांनी किती वेगवेगळे विचार मांडले आहेत. त्यांनी वाद-विवाद केले. पण ते समोरच्या मताचा आदर ठेऊनच. या वादविवादातून आवश्यक त्या सुधारणा करीत आपले दर्शन अधिक निर्दोष बनविले.

आपण आठ दर्शने पहिली. त्यातील तीन (जैन, बौद्ध आणि चार्वाक) नास्तिक दर्शने होती. नास्तिक याचा अर्थ वेदप्रामाण्य पूर्णपणे नाकारणारी. दोन दर्शने (पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा) वेदप्रामाण्याला महत्व देणारी होती.  तर अन्य तीन दर्शने (वैशेषिक, न्याय, सांख्य) वेदप्रामाण्य नाकारीत नाहीत. पण स्वीकारासंबंधी स्पष्टपणे सांगतही नाहीत. चार्वाक वगळता अन्य दर्शने मोक्ष/कैवल्य/ निर्वाण इत्यादी मनुष्याचे अंतिम लक्ष्य मानतात.

जैन आणि बौद्ध दर्शने वगळता अन्य सहा दर्शने (चार्वाक, वैशेषिक, न्याय, सांख्य, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा) हिंदू दर्शने (षटदर्शने) म्हणून परंपरेने मानली जातात. (अंबेच्या आरतीत 'साही विवाद करीता' असा या षटदर्शनांचा उल्लेख आहे) त्यांच्याकडे नजर टाकली असता हिंदू धर्माचा पाया किती विस्तृत आहे याची कल्पना येते. चार्वाकासारखे परलोक नाकारणारे , सांख्यांसारखे ईश्वर नाकारणारे, न्याय-वैशेषिक दर्शनासारखे अनेक ईश्वर आणि त्यांचा प्रत्येकाचा आत्मा मानणारे, वेदांतासारखे एकच ब्रह्म मानणारे दर्शन अशी ही विस्तृत परंपरा आहे. सांख्य दर्शन 'पुरुषाला' आपण अन्य पुरुषांपासून आणि प्रकृतीपासून वेगळे असण्याची जाणीव होणे (विवेक) म्हणजे मोक्ष असे समजते, तर वेदांत याच्या उलट, म्हणजे आत्म्याला आपण सर्व एकच ब्रह्मस्वरूप आहोत असे समजणे' म्हणजे मोक्ष असे समजते.

सध्या काही हिंदुत्ववादी संघटना हिंदुत्वाचा अर्थ संकुचित करू लागल्या आहेत. त्यांना अपेक्षित असलेली जीवनपद्धती, खाणेपिणे म्हणजेच हिदुत्व अशी त्यांची भावना आहे.  अनेक दर्शनांच्या विस्तृत पायावरच आज हिंदुधर्म टिकून आहे. या अतिरेकी हिंदुत्ववादी संघटनांना कळकळीची विनंती की त्यांनी हिंदू धर्माचा हा विस्तृत पाया खिळखिळा करू नये.

दु:ख निवारण हे बौद्ध धर्माचे मुख्य उद्दिष्ट आहे. बुद्धाने त्यासाठी यादेशात अनेक वेळा उगम पावून लुप्त झालेली ध्यानाची विद्या परत परिश्रमाने शोधून काढली.  'अविद्या' हे सर्व दु:खांचे मूळ कारण आहे असे सांगितले. अविद्या म्हणजे 'मी' (अहंकार) आणि 'माझे' (ममत्व). सध्या फेसबुकवर अनेक पोस्ट वाचताना बौद्धधर्म समर्थकांची भाषा पाहून गौतम बुद्धाच्या या शिकवणुकीचा त्यांना विसर पडला आहे अथवा त्यांच्यापर्यंत पोचविण्यासाठी समाजाचे धुरीण कमी पडताहेत असे वाटते. अशा पोस्टमधून 'अविद्येचीच' जोपासना होते आहे अशी भीती वाटते. हीच गोष्ट स्वत:ला हिंदू म्हणविणाऱ्या माझ्या काही बांधवांसाठी खरी आहे. 'अहंकार' आणि 'ममत्व' यांच्यामुळेच आपण मायेच्या आवरणाखाली येतो, बंधनात अडकतो असे अनेक उपनिषदांनी वारंवार सांगितले आहे. मग अहंकाराच्या आहारी जावून द्वेष जागवित ते धर्माचे कोठले काम करीत असतात?

आपण भारतीय आहोत. आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांचा आदर करण्याची आपली परंपरा आहे. एवढे लक्षात आले तरी या लेखमालेचा फायदा झाला असे मी म्हणेन.

लवकरच दुसऱ्या विषयावर  एखादी लेखमाला घेऊन आपल्या समोर येईन.

  

2 comments:

  1. सर अत्यंत व्याप्ती असलेल्या या विषयावर तुम्ही तुमच्या छोट्या लेखातून चांगला प्रकाश टाकलात.सर्व लेखमाला वाचून काढली आणि खुप भावली .अजूनही असं लिखाण वाचायला आणि ऐकायला ही आवडेल .मनापासून धन्यवाद �� ��

    ReplyDelete