दोन आकाशगंगा एकमेकांवर आदळल्या...
तर विश्वात सर्वात मोठा स्फोट होईल, असे तुम्हाला वाटते का?
आश्चर्याची गोष्ट म्हणजे... उत्तर आहे "नाही!"
हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये आकाशगंगांची टक्कर म्हणजे प्रचंड विध्वंस दाखवला जातो. पण खरे विज्ञान त्यापेक्षाही अधिक आश्चर्यकारक आहे.
पण प्रत्यक्षात जवळजवळ एकही तारा दुसऱ्या ताऱ्यावर आदळत नाही!
का माहीत आहे?
कारण विश्व दिसायला जरी ताऱ्यांनी भरलेले वाटत असले, तरी प्रत्यक्षात त्यात अफाट मोकळी जागा आहे. प्रत्येक ताऱ्यामधील अंतर इतके प्रचंड असते की दोन आकाशगंगा एकमेकांत मिसळल्या, तरी बहुतेक तारे एकमेकांच्या अगदी जवळून निघून जातात.
मग प्रश्न पडतो...
जर तारे आदळतच नसतील, तर शास्त्रज्ञ आकाशगंगांच्या टकरीला इतके महत्त्व का देतात?
कारण खरी उलथापालथ ताऱ्यांमध्ये नाही, तर वायू आणि धुळीमध्ये घडते.
आकाशगंगा एकमेकांच्या गुरुत्वाकर्षणात अडकल्या की त्यातील वायू अस्थिर होतो. तो हळूहळू आकाशगंगेच्या मध्यभागाकडे वाहू लागतो. आणि तिथे कोण वाट पाहत असते?
तेच अदृश्य अतिभव्य कृष्णविवर!
हा वायू कृष्णविवरात पडू लागला की त्याचे वस्तुमान झपाट्याने वाढते. त्यामुळे अनेक वर्षे शास्त्रज्ञांचा ठाम विश्वास होता की अतिभव्य कृष्णविवरे मोठी होण्यामागे मुख्य कारण म्हणजे आकाशगंगांच्या टकरी.
पण विज्ञानात प्रत्येक उत्तरातून नवा प्रश्न जन्माला येतो...
ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी अशा अनेक सर्पिल आकाशगंगांचा अभ्यास केला, ज्यांची आजवर कोणत्याही दुसऱ्या आकाशगंगेशी टक्करच झाली नव्हती.
मग त्यांच्या केंद्रातील कृष्णविवरे लहान असायला हवी होती...
पण जे दिसले, त्याने खगोलशास्त्रालाच धक्का बसला!
त्या शांत, एकाकी आकाशगंगांमध्येही सूर्यापेक्षा कोट्यवधी- अब्जपट मोठी कृष्णविवरे सापडली.
म्हणजेच आकाशगंगांची टक्कर हा कृष्णविवराच्या वाढीचा एकमेव मार्ग नव्हता.
मग एवढी प्रचंड कृष्णविवरे वाढली तरी कशी?
याचे उत्तर शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी संपूर्ण विश्वच संगणकात निर्माण केले... आणि त्यातून समोर आलेले सत्य आणखी थक्क करणारे होते!
ते आपण पुढील भागात पाहू.
तुमच्या मते, कृष्णविवराला "अन्न" कोण पुरवत असेल—आकाशगंगांची टक्कर, की विश्वात अजून एखादी अदृश्य प्रक्रिया सुरू आहे?
©संतोष कारखानीस
No comments:
Post a Comment