गंगाधरपंत ज्या जगातून परत आले… ते जग खरंच दुसरं होतं का?
समजा, आज तुम्ही एखादा निर्णय घेतला… आणि त्या क्षणी तुमच्या आयुष्याची दुसरी वाट निघून गेली तर?
तुम्ही घेतलेला निर्णय एका वाटेवर पुढे जाईल. पण दुसऱ्या वाटेवर काय झालं असेल?
जयंत नारळीकरांच्या ‘गंगाधरपंतांचे रहस्य’ ('यक्षाची देणगी' या पुस्तकातील) या विज्ञानकथेत असाच एक विलक्षण प्रसंग येतो.
सगळं ओळखीचं आहे… मुंबई आहे, माणसं आहेत, रस्ते आहेत.
पण इतिहास बदललेला आहे.
पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झालेला नाही. विश्वासराव वाचले आहेत. ब्रिटिश भारतावर राज्य करत नाहीत. आणि त्यांच्या समोरचा भारत एका वेगळ्याच इतिहासातून घडलेला आहे.
गंगाधरपंत थक्क होतात.
“हे कसं शक्य आहे?”
कारण त्यांच्या मनात अपघाताच्या क्षणी एकच विचार होता — “पानिपतच्या युद्धात मराठे जिंकले असते तर?”
कथेतील वैज्ञानिक स्पष्टीकरण आणखी विलक्षण आहे — त्यांच्या मनाने एका वेगळ्या ‘संभाव्य विश्वाची’ वाट धरली असावी.
आता क्षणभर कथा बाजूला ठेवूया.
तुमच्या आयुष्यात असं किती वेळा झालं आहे?
“त्या दिवशी मी तिथे गेलो असतो तर…”
“ती नोकरी स्वीकारली असती तर…”
“तो निर्णय घेतला नसता तर…”
“त्या व्यक्तीची भेट झाली नसती तर…”
आपण या सगळ्याला फक्त ‘जर-तर’ म्हणतो.
पण कल्पना करा, यातील एखादी शक्यता कुठेतरी स्वतंत्र वास्तव म्हणून अस्तित्वात असेल तर?
एका जगात तुम्ही आज जे आहात तेच आहात.
दुसऱ्या जगात तुम्ही एखादा वेगळा निर्णय घेतलेला आहे.
एका जगात तुम्ही मुंबईत राहिलात.
दुसऱ्या जगात कदाचित तुम्ही पुण्यात गेलात.
एका जगात तुमची एखाद्या व्यक्तीशी भेट झाली.
दुसऱ्या जगात ती भेट कधी झालीच नाही.
आणि मग प्रत्येक वेगळ्या निर्णयातून पुढे आणखी शक्यता फुटत गेल्या तर?
तुमच्या आयुष्याचा एक सरळ रस्ता न राहता, तो एका प्रचंड झाडासारखा झाला तर?
एका फांदीवर तुमचं आजचं आयुष्य…
आणि दुसऱ्या फांदीवर तुमच्या एका वेगळ्या निर्णयातून निर्माण झालेलं आयुष्य!
याच प्रकारच्या “अनेक शक्यता” या कल्पनेशी Quantum Mechanics मधील Many-Worlds Interpretation जोडली जाते.
पण इथे एक मोठी सूचना आवश्यक आहे.
आपल्या प्रत्येक निर्णयामुळे खरंच एक नवीन विश्व निर्माण होतं, याचा प्रयोगात्मक पुरावा आज आपल्याकडे नाही. ही एक सैद्धांतिक मांडणी आहे — आणि नारळीकरांची कथा ही अशा कल्पनेला विज्ञानकथेच्या रूपात अनुभवण्याची सुंदर संधी देते.
मग पाचव्या मितीची कल्पना इथे आणखी रोमांचक होते.
समजा, आपल्या आयुष्याच्या अशा असंख्य शक्यता एका प्रचंड नकाशावर पसरलेल्या आहेत.
आपण त्या नकाशावर फक्त एकच रस्ता पाहतो.
पण त्या संपूर्ण नकाशाकडे पाहणाऱ्या एखाद्या उच्च-मितीय निरीक्षकाला कदाचित आपल्या नजरेआड गेलेल्या बाकीच्या शक्यताही दिसत असतील!
आणि मग एक धक्कादायक प्रश्न उभा राहतो…
जर त्या सगळ्या शक्यता अस्तित्वात असतील, तर त्या एकमेकांपासून कायमच्या वेगळ्या आहेत का?
की एका शक्यतेतून दुसऱ्या शक्यतेपर्यंत जाण्याचा एखादा मार्ग असू शकतो?
गंगाधरपंतांना त्यांच्या वेगळ्या वास्तवातून परत आपल्या जगात आणणारा तो रहस्यमय अनुभव आठवा…
आणि आता कल्पना करा — जर तो केवळ विज्ञानकथेतील प्रसंग नसून, विश्वाच्या रचनेत दडलेल्या एखाद्या शक्यतेची झलक असेल तर?
हा प्रश्न आपल्याला घेऊन जातो सहाव्या मितीकडे…
©संतोष कारखानीस
No comments:
Post a Comment