एका क्षणासाठी कल्पना करा… तुमच्यासमोर तुमचंच दुसरं आयुष्य उभं आहे!
तुम्ही त्याच्याकडे पाहत आहात. चेहरा तुमचाच आहे. पण आयुष्य वेगळं आहे. कारण काही वर्षांपूर्वी त्याने असा निर्णय घेतला, जो तुम्ही घेतलाच नाही.
मागच्या भागात आपण गंगाधरपंतांच्या कथेतून अशाच एका वेगळ्या वास्तवाची कल्पना पाहिली. एका वेगळ्या शक्यतेत पानिपतचा इतिहास बदलला होता… आणि त्याबरोबर संपूर्ण भारताचं भविष्यही.
पण आता एक प्रश्न आहे.
समजा अशी दुसरी शक्यता कुठेतरी अस्तित्वात आहे, तर तिच्यापर्यंत पोहोचता येईल का?
कल्पना करा, तुमच्यासमोर एक मोठा नकाशा आहे.
एका ठिकाणी तुमचं आजचं आयुष्य.
त्यापासून एक रस्ता फुटतो — जिथे तुम्ही वेगळा निर्णय घेतला होता.
पुढे आणखी रस्ते फुटतात.
कुठेतरी तुम्ही वेगळ्या शहरात आहात. कुठेतरी दुसऱ्या व्यवसायात. कुठेतरी तुमची एका व्यक्तीशी भेट झाली आहे… तर कुठेतरी ती भेट कधी झालीच नाही.
आपण पाचव्या मितीच्या कल्पनेत अशा असंख्य शक्यतांचा विचार केला.
पण त्या सगळ्या शक्यता जर एका प्रचंड नकाशावर असतील, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला तो संपूर्ण नकाशा पार करावा लागेल का?
की नकाशाच दुमडता येईल?
टेबलवर एक कागद ठेवा.
त्याच्या एका टोकावर A आणि दुसऱ्या टोकावर B लिहा.
A पासून B पर्यंत जायचं असेल तर कागदावरून बरंच अंतर चालावं लागेल.
पण आता कागद मधोमध दुमडा.
A आणि B अचानक एकमेकांच्या जवळ येतील.
तुम्ही A पासून B पर्यंतचा लांब प्रवास केला नाही.
तुम्ही कागदाची रचनाच बदलली!
आता विश्वाबद्दल अशीच एक विलक्षण कल्पना करा.
आपल्या 3D जगात दोन ठिकाणं एकमेकांपासून प्रचंड दूर असू शकतात. पण जर विश्वाची रचना आपण पाहतो त्यापेक्षा अधिक मितीय असेल, तर त्या दूरच्या ठिकाणांना जोडणारा एखादा वेगळा मार्ग असू शकतो का?
ही कल्पना आपल्याला सहाव्या मितीच्या चर्चेकडे घेऊन जाते.
आता पुन्हा त्या काल्पनिक दुसऱ्या विश्वाकडे चला.
तुम्हाला तिथे जायचं आहे.
समोरचं अंतर लाखो प्रकाशवर्षांचं आहे.
सामान्य अंतराळयानाने तिथे पोहोचणं जवळजवळ अशक्य वाटतं.
पण अचानक तुमच्यासमोर अवकाशाचा एक छोटासा भाग वाकल्यासारखा दिसतो.
जणू एखाद्या कागदाला दुमडल्यावर दोन दूरचे बिंदू एकमेकांसमोर आले आहेत.
तुम्ही त्या वाकलेल्या अवकाशाच्या दारातून पुढे जाता…
आणि काही क्षणांत समोर एक वेगळंच आकाश उघडतं!
तारे ओळखीचे नाहीत.
ग्रह ओळखीचा नाही.
आणि कदाचित…
हे तुमचं विश्वही नाही!
अंगावर रोमांच आणणारी कल्पना आहे, नाही का?
पण इथे विज्ञान आणि विज्ञानकथा यांच्यातली सीमा लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे.
अशा प्रकारे एका विश्वातून दुसऱ्या विश्वात प्रत्यक्ष प्रवास करता येतो, याचा आज कोणताही प्रयोगात्मक पुरावा नाही. सहावी मिती म्हणजे अशी ‘दुसऱ्या विश्वात जाण्याची वाट’ आहे, हेही सिद्ध झालेलं नाही.
ही उच्च मिती, Space-Time आणि वेगवेगळ्या शक्यतांबद्दलच्या सैद्धांतिक कल्पनांना समजून घेण्यासाठी केलेली कल्पना आहे.
पण विज्ञानाची गंमत अशीच आहे.
कधी कधी एक प्रश्न दुसऱ्या प्रश्नाचं दार उघडतो.
जर वेगवेगळ्या शक्यता असतील…
आणि त्या शक्यतांमध्ये वेगवेगळ्या विश्वांची कल्पना करता येत असेल…
तर त्या सगळ्या विश्वांचे नियमही सारखेच असतील का?
समजा, तुम्ही अशा एका विश्वात पोहोचलात जिथे गुरुत्वाकर्षण आपल्या विश्वासारखं नाही.
जिथे एखादी वस्तू खाली पडण्याऐवजी वर उडते.
जिथे प्रकाशाचा वेग वेगळा आहे.
जिथे पदार्थाचे मूलभूत गुणधर्मच वेगळे आहेत.
मग तिथे तारे कसे तयार होतील?
ग्रह तयार होतील का?
आणि सर्वात मोठा प्रश्न…
तिथे जीवन निर्माण होऊ शकेल का?
आता आपण आपल्या विश्वाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या पलीकडे जात आहोत.
आपण अशा विश्वांची कल्पना करू लागलो आहोत, ज्यांचे नियमच वेगळे आहेत.
आणि इथून पुढची मिती आपल्यासमोर आणखी मोठं दार उघडते…
सातवी मिती!
कदाचित तिथे प्रश्न फक्त “आपल्या विश्वाची दुसरी शक्यता कोणती?” असा नसेल.
प्रश्न असेल…
“आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या नियमांनी चालणारं विश्व कसं असेल?”
©संतोष कारखानीस
#विज्ञान #विश्व #आयाम #SpaceTime #Multiverse
No comments:
Post a Comment