Wednesday, October 12, 2022

लेणी

 ऐतिहासिक नाणेघाटला जाताय? तर आवश्य वाचाच.

मित्रांनो आपण जर जुन्नर तालुक्यातील जुन्नर ते नाणेघाट प्रवास करत असाल तर आपण लेख आवश्य एकदा वाचा व खालील ऐतिहासिक वारसा क्रमानुसार नक्कीच पहायला विसरू नका.
१) *माणमोडी बौद्ध लेणी समूह.*
किल्ले शिवनेरी च्या पुर्वेस पुर्व- पश्चिम पसरलेल्या डोंगररांगेस माणमोडी डोंगर असुन या डोंगरात तीन लेणी समूह पहायला मिळतात.
१)अंबा अंबिका लेणी समूह
२) भिमाशंकर लेणी समूह
३)भूतलिंग लेणी - समूह हा जुन्नरच्या मानमोडी डोंगरात आहे . मानमोडी लेणी समूहातील लेण्यांपैकी लेणे क्र . 40 हे भूत लेणी चैत्यगृह असून हे जुन्नरमधील सर्वात देखणे दर्शनी भाग असलेले आहे . चैत्यकमानीवर पंचफणाधारी नागराज , मनुष्यरूपातील गरुड शिल्प कोरले आहे . या शिल्पांना स्थानिक लोक भुते , तर त्यांच्या बाजूस असलेल्या स्तूपांना लिंग समजत . यावरून या लेण्यास ‘ भूत ' किंवा ' भूतलिंग ' असे नाव पडले असे म्हटले जाते .
२) *किल्ले शिवनेरी*
शिवनेर किंवा कुकडनेर या खोऱ्यामध्ये शिवनेरी हा प्राचीन किल्ला आहे . हा किल्ला महान मराठा राजा श्री. शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे . याच्या पायथ्याला जुन्नर गाव आहे . या दुर्गावर शिवाई देवीचे मंदिर , गंगाजमना टाकं , शिवकुंज , शिवजन्मस्थान इमारत आणि तिन्ही बाजूंना कोरीव लेणी आहेत . संपूर्ण देशातून असंख्य शिवप्रेमी व पर्यटक दर्शनासाठी वर्षभर या किल्याला भेट देतात .
३) तुळजाभवानी बौद्ध लेणी समूह
जुन्नर शहरापासून पश्चिमेस ४कि.मी अंतरावर आपणास हा तुळजाभवानी लेणी समूह पहायला मिळतो. महाराष्ट्रातील सर्वात प्रथम कोरलेला हा लेणी समूह असुन येथील १२ खांबावर तबकडीच्या आकाराची तरलेली लेणी ही विशिष्ट प्रकारची असुन ती इतरत्र कुठेही पहावयास मिळत नाही.
४) *किल्ले चावंड*
जुन्नरच्या पश्र्चिमेला नाणेघाट डोंगररांगेतील उत्कृष्ट कातळ अंड्यांची सुंदर भौगोलिक रचना असलेला अर्थात किल्ले चावंड हा गिरिदुर्ग आहे . किल्लूयावर पुष्करणी, सरकारी वाडा, धान्य कोठार व पाण्याच्या टाक्या आहेत. सप्तमातृका टाक्या पाहुन किल्याचा काही आगळावेगळा इतिहास असावा असे वाटते. किल्यावर चावंडा देवीचे मंदिर आहे . गडावरून कोकणातील विस्तृत प्रदेश पाहता येतो , माणिकडोह धरण, किल्ले हडसर, किल्ले निमगिरी आणि परीसराचे दर्शन सुरेख होते . हा गिरिदुर्ग जुन्नरचा महत्वाचा भू - वारसा आहे .
५) *कुकडेश्वर मंदिर* Kukadeshwar Temple
कुकडेश्ववर शिवालय हे महाराष्ट्रातील पुरातन काळी बांधलेल्या दगडी मंदिरांपैकी एक आहे . अखंड दगडात केलेले कोरीव काम आणि स्थापत्य कलेचा उत्तम आविष्कार असलेले हे मंदिर तुलनेने अप्रसिद्ध आहे . नवव्या शतकातील शिलाहारवंशीय झंझ राजाने हे मंदिर बांधले . या मंदिरापासून कुकडी नदीचा उगम होतो . चुन्याचा वापर न करता एकावर एक दगड रचून हे मंदिर तयार केले गेले .
६) *ऐतिहासिक नाणेघाट*
नाणेघाट परिसर कोकणपट्टी आणि देश यांच्यामध्ये उभ्या असणाऱ्या सह्याद्रीतून माणसांची अन् वाणसामानाची ने - आण करण्यासाठी एका उत्तम घाटवाटेची निर्मिती सातवाहनांच्या साम्राज्याने नाणेघाटाच्या रुपात केली . या घाटमाथ्यावर ' नानाचा अंगठा ' नावाचा सुळका आहे . त्याला खेटूनच सुमारे ६० मी . लांबीचा अन् २ ते ५ मी . रुंदीचा नाणेघाट हा खोदीव नळीचा किंवा बोळीचा भाग आहे . त्याकाळच्या व्यापारी मालावर याठिकाणी जकात आकारली जात असे. त्यासाठी येथे लेण्या कोरलेल्या असुन त्याच लेणित २२०० वर्षांपूर्वी शिलाले कोरण्यात आला असून विविध दाणधर्माचा त्यात उल्लेख केला आहे व हाच शिलालेख मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा सर्वात मोठा पुरावा मानला जातो.
७) *किल्ले जीवधन* - वांदरलिंगी सुळका Jeevdhan Fort - Vandarlingi Pinnacle
जुन्नरच्या पश्र्चिमेला नाणेघाट डोंगररांगेतील मुकुटमणी अर्थात किल्ले जीवधन हा गिरिदुर्ग आहे . किल्लूयावर गजलक्ष्मीचं शिल्प आहे . गावकरी याला कोठी असे संबोधतात . किल्यावर जीवाई देवीचे मंदिर आहे . गडावरून कोकणातील विस्तृत प्रदेश पाहता येतो , वांदरलिंगी सुळक्याचे व नाणेघाटाचे दर्शन सुरेख होते . हा गिरिदुर्ग आणि सुळका जुन्नरचा महत्वाचा भू - वारसा आहे .
संपूर्ण लेख हा copyright ©️ असुन आपण संपूर्ण माहिती व नावासहीतच प्रसारीत करू शकता.
लेख/ छायाचित्रे - श्री रमेश खरमाळे, माजी सैनिक
मो. नं. ८३९०००८३७०

Sunday, September 4, 2022

माझे ठाणे

 १> इसवी सनाच्या नवव्या शतकात शिलाहार साम्राज्याच्या बिंब राजाने आपली राजधानी महिकावतीहून (केळवे माहीम) ठाण्याला हलविली. 

२> राजाने आपल्या हत्तींना पोहण्यासाठी तेथील तलाव खोदून मोठा केला. तोच सध्याचा मासुंदा तलाव. त्याच्या काठाशी असलेलया भव्य शिवमंदिरासमोर आपला राजवाडा बांधला. मासुंदा तलावाची हद्द पूर्वी (स्वातंत्र्याच्यावेळी) पूर्वेला कौपिनेश्वर मंदिरापासून पश्चिमेला हनुमान व्यायामशाळेपर्यंत आणि उत्तरेला मुंबई रस्त्यापासून दक्षिणेला मो.ह.विद्यालयापर्यंत होती. मुंबई रस्ता हा देवळांचा रस्ता होता. हा रस्ता प्राचीन काळापासून ठाणे बंदराला उत्तर भारताशी जोडणारा रस्ता होता. याच रस्त्यावर सम्राट अशोकाने अशोक स्तंभ बसविला होता. स्वातंत्र्यानंतर मासुंदा  तलावाचा पूर्वेकडील भाग बुजवून तेथे उद्यान आणि शिवाजी पथ करण्यात आला. तसेच तलाव  काही प्रमाणात बुजवून तलावाच्या सर्व बाजूस रस्ता करण्यात आला. तसेच तलावाच्या मध्यभागात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला. 

३> बिंब राजा शिवभक्त  असल्याने त्याने ठाण्यात साठ तलाव खोदून त्याकाठी शिवमंदिरे बांधून घेतली. तेव्हापासून ठाणे 'षष्टीस्थानाक' म्हणून ओळखले जाऊ लागले. १९७५ च्या सुमारास यातील अनेक तलाव महानगरपालिकेने बुजवून त्यावर रस्ते/बागा/इमारती बांधल्या. उदारणार्थ घंटाळी देवीच्या बाजूचे मैदान हा एक विस्तीर्ण तलाव (घंटाळी तलाव) होता. तो सहयोग मंदिरापर्यंत पसरलेला होता. आजचे रंगायतन आणि शिंदे तरणतलाव याच सुमारास तळे (मासुंदा तलाव) बुजवून बांधला गेला आहे. 

४> पोर्तुगीज राजवटीत मुंबई रस्त्यावरील देवळे पाडून त्यातील मूर्ती मासुंदा तलावात टाकून त्यावर 'सेंट जॉज चर्च' बांधण्यात आले. आजही मुंबई रस्त्यावरील घरांचे पुनर्बांधणी होताना जमिनीत गाडल्या गेलेल्या प्राचीन मूर्ती सापडतात. 

५> पहिल्या बाजीरावाचे भाऊ चिमाजीअप्पा यांनी ठाणे-वसई यावरील पोर्तुगीज राजवट समाप्त करण्याचे ठरविले. तेव्हा ठाण्यातील येऊर येथील एका टेकडीवरून या किल्ल्याची आणि परिसराची पाहणी केली होती. आजही या ठिकाणावरून वसईचा किल्ला दिसतो. याच लढाईच्या वेळी मराठ्यांचे 'महागिरी' हे जहाज ठाण्याच्या खाडीत रुतून बसले. त्या भागाला नंतर महागिरी हेच नाव पडले. 

६> ठाण्याचा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला. हा एक भक्कम किल्ला म्हणून ओळखला जात होता. तो ब्रिटिशांचे हातात आल्यावर त्याचा तुरुंग म्हणून वापर झाला. या किल्ल्याचे एक दार (त्या काळी) थेट खाडीत उघडत असल्याने या किल्ल्यातून अंदमानला नेले जाणारे कैदी नेत असत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना याच किल्ल्यातून अंदमानला नेले होते. अनंत कान्हेरे आणि त्यांच्या क्रांतिकारक साथीदारांना याच किल्ल्यात इंग्रजांनी फाशी दिले होते. या किल्ल्यात आजही खतरनाक कैदी ठेवले जातात. 

७> ठाण्याचे मीठबंदर हे एके काळी अत्यंत नावाजलेले बंदर होते. येथून मुख्यतः: मीठाचा व्यापार चालत असे. ठाण्यातील घोडबंदर येथे अरबी घोडे उतरवून घेतले जात. घोडबंदर येथे एक किल्लाही आहे. 

८> ठाण्यातील मूळ जमात म्हणजे आगरी आणि कोळी. चेंदणी भागात कोळीवाडा आहे. तेथेच ठाण्याची मूळ ग्रामदेवता आहे.  बिंब राजाने राज्यकारभार सांभाळण्यासाठी त्यात प्राविण्य मिळविलेल्या काश्मीरमधील चिनाब नदीच्या (चांद्रशोणा) खोऱ्यातील कायस्थांना आणि गुजरातमधील पाठारेंना येथे आणले. त्यांना 'प्रभू' ही पदवी दिली. त्यातील कायस्थ (चांद्रसेनीय कायस्थ प्रभू) ठाण्यात आणि आसपासच्या परिसरात स्थायिक झाले. पाठारे प्रभू मुंबईला स्थायिक झाले. 

९> ठाणे हे अर्वाचीन युगात महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळखले जाते. जनकवी पी. सावळाराम हे ठाण्याचे नगराध्यक्ष होते. नावाजलेले क्रिकेटपटू खंडू रांगणेकर हे ठाण्यातीलच. ठाण्याचे मराठी ग्रंथ संग्रहालय हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या मराठी वाचनालयांपैकी एक आहे. 

Tuesday, August 9, 2022

मुलांशी काय बोलायचं? भाग १ लेखक चेतन एरंडे

 मुलांशी काय बोलायचं? भाग १

मला आठवतंय मी होमस्कुलिंग म्हणजे काय? या विषयांवर बोलण्यासाठी एका पालक गटाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे मला एका पालकांनी विचारलेला प्रश्न आश्चर्यचकित करणारा होता. तो म्हणजे "होमस्कुलिंग करता म्हणजे तुमचं मूल सारखं तुमच्या डोळ्यासमोर असणार. मग तुम्हाला ते "इरिटेट" होत नाही का? सारखं त्याच्याशी बोलत राहण्याचा कंटाळा येत नाही का? आमचं मूल सुट्टीच्या दिवशी घरी असलं तरी त्याच्याशी सारखं काय बोलायचं हा प्रश्न पडतो? मग तुम्ही नक्की बोलता तरी काय?"
त्यावेळी मी या प्रश्नाला फक्त हसून उत्तर दिलं!
आपल्या मुलाशी काय बोलायचं, असा प्रश्न पालकांना पडत असेल का? हा विचार मनात तेव्हापासून घोळत असताना मला काही दिवसांपूर्वी रिबेका रोलंड यांनी लिहिलेल्या "थी आर्ट ऑफ टॉकिंग विथ चिल्ड्रेन" या नावाच्या एका पुस्तकाविषयी कळलं. मी हे पुस्तक पूर्ण वाचलेलं नसलं तरी या पुस्तकात मुलांशी काय बोलावं याविषयीच्या टिप्स मला वाचायला मिळाल्या, त्या सोप्या करून इथे मांडायचा मी प्रयत्न करतोय.
१. तू मला काय शिकवशील? या वाक्याने मुलांशी संवादाला सुरुवात करू मुलांना "शिकवण्यासाठी" त्यांच्याशी केलेल्या संवादापेक्षा, मुलांकडून "शिकण्याच्या" इच्छेने केलेला संवाद हा अधिक प्रभावी असतो.
आपण पूर्वी मुलांकडून शिकायच्या गोष्टींची यादी तयार करून तसा एखादा समर कॅम्प घेण्याचा विचार केला होता. गंमत म्हणजे या लेखिकेने सुद्धा "चल, मी तुला शिकवतो यापेक्षा तू मला काय शिकवशील" या वाक्याने संवाद कसा मस्त बहरतो, हेच सुचवले आहे! म्हणजे या दिवाळीत आपण असा प्रयोग करून बघायला हरकत नाही!
२. तू आणि मी चिडल्यावर घाबरल्यावर, दुःखी असू तर किंवा कुणाकडून दुखावले असू तर आपण कसे रिऍक्ट होतो? या विषयावर आपण गप्पा मारू शकतो. गप्पा मारता मारता अशा वेळी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत आपला राग, आनंद, दुःख, भीती कशी व्यक्त करायची याच्या टिप्स आपण शेअर करू शकतो.
३. तुला अशी एखादी गोष्ट आठवतेय जी करताना तुझ्या मनात प्रचंड भीती होती, अस्वस्थता होती तरीही ती गोष्ट तू केलीस? तेव्हा तुला कसं वाटलं?
हे बोलता बोलता भीती आणि त्या अनुषंगाने एकीकडे धोकादायक कृत्य तर करायचं नाही पण दुसरीकडे भीतीमुळे मागं राहून संधीही घालवायची नाही, हे कसं जमवायचं हे उदाहरणांतून मुलांना सांगत आपण संवाद वाढवू शकतो. मग त्यात हेल्मेट घालणे असेल, गिर्यारोहण असेल किंवा मग बेफिकीरपणे रस्त्यावर सायकल, गाडी चालवणं असे, अशा विषयांवर गप्पा होऊ शकतात.
४. अशी कुठली ऍक्टिव्हिटी आहे जी करताना तुला स्ट्रेस तर येतो पण मजा पण येते ?
हे बोलता बोलता आपण स्ट्रेस ही काही दरवेळी वाईटच गोष्ट असते असं नाही तर स्ट्रेस घेतल्याने आपण दोन पावलं पुढं देखील कसं जाऊ शकतो? हे सांगू शकतो. तसेच कष्ट घेणं ही काही वाईट किंवा कमी पणाची गोष्ट नाहीये, उलट अनेकदा कष्ट आपल्या प्रगतीसाठी कसे गरजेचे असते हेही सांगू शकतो.
५. तुला सगळ्यात जास्त सुरक्षित कधी वाटतं आणि का?
मला माहिती नाहीये आपण कितीवेळा या विषयवार आजपर्यंत मुलांशी बोलले असू. पण मला वाटतं की हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मूल जेव्हा बोलण्याच्या मनस्थितीत असेल, आजूबाजूला योग्य वातावरण असेल तेव्हा हा प्रश्न आपण विचारून बघितलाच पाहिजे! याचे फायदे काय आहेत? हे मी सांगण्याची गरज नसावी!!
पुढचे पाच मुद्दे पुढच्या भागात..
महत्वाचे: अशा प्रकारे संवाद करत असताना, घरातील वातावरण, मुलाचा आणि आपला मड या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे मुलांशी संवाद सुरु करण्याआधी मुलाला कंफर्टेबल वाटेल असं वातावरण तयार करण्यावर भर दिला पाहिजे नाहीतर हा संवाद "बॅकफायर" होऊ शकतो!!
क्रमशः
चेतन एरंडे

Wednesday, August 3, 2022

selfstudy-8

 या लेखमालेतील हा शेवटचा लेख. आपण यापूर्वी आपल्या मेंदूचे आणि चेतासंस्थेचे काम कसे चालले हे पाहिले. चेतातंतूंवरील मेदाच्या थराचे महत्व ओळखले. मागील काही लेखांत आपण विज्ञान, समाजशास्त्रे, गणित या विषयांचा अभ्यास कसा करायचा हे पाहिले. या लेखात भाषा विषयाचा अभ्यास कसा करायचा हे पाहू. 

आपल्यापैकी अनेकांना इंग्रजी ही भाषा कठीण वाटते. बोली इंग्रजी भाषा शिकविण्याचे वर्ग भरपूर पैसे कमावतात. माझी इंग्रजी भाषा नानावीपर्यंत कच्ची होती. पण आमच्या मुख्याध्यापकांनी (सामंतसर - मो.ह.विद्यालय ठाणे) आम्हाला भाषा शिकण्याची एक युक्ती सांगितली. त्यामुळे माझी इंग्रजी चांगली झाली.  कोणतीही भाषा शिकायची असेल तर तुमचे विचार त्या भाषेतून आले पाहिजेत. मराठीतून विचार करून त्याचे इंग्रजी अथवा अन्य भाषांत रूपांतर करून तुम्ही बोललात तर त्या भाषेवर प्रभुत्व येणार नाही. यासाठी रोज एक पान त्या भाषेत निबंध लिहिणे आवश्यक आहे. या निबंधाचा विषय कोणताही असावा. त्या दिवशी तुमच्या डोक्यात येईल तो विषय. हा निबंध लिहून झाला की इंग्रजी येत असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून तपासून घ्यावा. मात्र कोणत्याही विषयाच्या शिक्षकाकडून नको. बहुसंख्य शिक्षकांना चुका काढून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खच्ची करण्याची सवय असते. म्हणून शिक्षक नकोत. घरातील अथवा ओळखीची कोणीही व्यक्ती, जी ढोबळ चुका प्रेमाने दाखवू शकेल अश्या व्यक्तीकडून हा निबंध तपासून घ्यावा. रोज असा एक निबंध लिहिला की काही महिन्यात आपण निबंध लिहिण्यास बसलो की आपले विचार त्या त्या भाषेत सुरु होऊ लागतील.  इंग्रजी पुस्तक वाचणे अथवा दिवसातून काही वेळ इंग्रजी बोलणे यापेक्षा ही पद्धत मला सुटसुटीत वाटते. 

मी गेले काही दिवस ही लेखमाला लिहितो आहे. आपल्या पाल्यांवर विश्वास ठेवणे हे प्रथम आवश्यक आहे. कोचिंग क्लासचे शिक्षक कदाचित विद्यार्थ्यांकडून या वर्षीचा अभ्यास करून घेतील ही, पण त्यातून आपल्या पाल्याचा आत्मविश्वास कसा जागृत होणार? पुढे तो जेव्हा व्यवसायात/नोकरीत पाऊल ठेवेल तेव्हा त्याला येणाऱ्या समस्या त्यालाच सोडवायच्या आहेत. तेथे कोठलाही कोचिंग क्लास नसेल. या समस्या सोडविण्यासाठी त्याचा आत्मविवास जागृत असायला हवा. आणि त्याच्यात आत्मविश्वास जागृत करण्याचे काम तो लहान असतानाच - त्याच्या संस्कारक्षम वयातच व्हायला हवे. कोचिंग क्लासला न जाता कदाचित त्याला आज थोडे कमी मार्क्स मिळतील. पण मिळवलेले मार्क्स 'त्याचे' असतील त्याने परिश्रमाने मिळविलेले असतील. हे मार्क्सच त्याला आत्मविश्वास देतील. 

पालकांनो, विचार करा. आपल्या मुलांना भविष्यात या जगात वावरताना आत्मविश्वास देणे हे आपले कर्तव्य आहे.  आपणास काही शंका असतील, भविष्यातही काही मदत लागली तर माझ्याशी संपर्क साधण्यास संकोच करू नका. ही लेखमाला मी येथेच संपवितो.