अद्वैत तत्वज्ञानानुसार मृत्यूनंतर माणसाचे चैतन्य (म्हणजे आपण) कोठेही जात नाही. कारण मुळात चैतन्य हे सर्वव्यापी आहे. म्हणजेच आपल्याला पुनर्जन्म नाही. जर जन्मच नसेल तर पुनर्जन्म कसा असेल?
Tuesday, December 6, 2022
जन्म-पुनर्जन्म
Monday, December 5, 2022
अनंत : अद्वैत वेदांताची संकल्पना
वेदांतानुसार आपण अनंत आहोत. मात्र मायेच्या प्रभावामुळे आपल्याला आपण बद्ध झाल्यासारखे वाटते.
ही बद्धता तीन प्रकारची असते.
१> एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी असेल तर ती अन्य ठिकाणी असणे शक्य नाही. म्हणजेच त्या वस्तूला स्थलाचे (space) बंधन आहे. आपण आता आपल्या घरी आहोत, म्हणजेच अन्य ठिकाणी असणार नाही, रस्त्यावर असणार नाही. याला प्राचीन भाषेत 'देशपरिच्छेद:' असे म्हणतात. परिच्छेदाचा शब्दश: अर्थ 'कापणे' आहे. या अवकाशाचे विभाजन केले तर या ठिकाणी तुम्ही आहात. (किंवा तुमच्यामुळे या अवकाशाचे विभाजन झालेले आहे). जे देशापरिच्छेद करत नाही म्हणजेच एकाचवेळी सर्वठिकाणी असते (Omnipresent) त्याला 'देशापरिच्छेदशून्य' असे म्हणतात. अद्वैत वेदांतानुसार ब्रह्म हे देशापरिच्छेदशून्य आहे..
२> दुसऱ्या प्रकारची बद्धता हे काळासंदर्भात असते. प्रत्येक वस्तू ही काही ठराविक काळातच अस्तित्वात असते. लहान कीटक काही काळ अस्तित्वात असतात, मानव कदाचित शंभर वर्षे अथवा त्याच्या आसपासच्या काळापर्यंत अस्तित्वात राहू शकेल, तारे कदाचित काही कोटी वर्षे अस्तित्वात राहू शकतील. पण याला काही मर्यादा आहे. याला प्राचीन भाषेत 'कालपरिच्छेद:' असे म्हटले आहे. बुद्धाच्या मते ज्याची सुरुवात आहे त्याला अंतही आहे. जे कालाचे विभाजन करीत नाही, म्हणजेच अनंत काल उपलब्ध होते आणि राहणार आहे त्याला कालपरिच्छेदशून्य (Omnipresent) असे म्हटले आहे. अद्वैत वेदांतानुसार ब्रह्म हे कालपरिच्छेदशून्य आहे.
३> तिसरी बध्दता ही नाम-रूपासंबंधी (Object) आहे. एखादी वस्तू ही ती वस्तूच आहे आणि अन्य काहीही नाही. हे म्हणजे एखाद्या वस्तूला तिचे विशेषत्व देण्यासारखे आहे (Law of idendity). एखादी वस्तू 'अ' आहे याचाच अर्थ ती 'ब' 'क' इत्यादींपासून वेगळी आहे. मी 'संतोष कारखानीस ' आहे याचाच अर्थ मी अन्य कोट्यवधी माणसांपासून वेगळा आहे. मला - माझ्या या देहाला आधार कार्ड क्रमांक मिळाला की मी आपोआप अन्य देहांपासून वेगळा ओळखला जातो. हा आहे 'वस्तूपरिच्छेद:'. एखादी गोष्ट वस्तुपरिचछेदशून्य असेल तर याचाच अर्थ अन्य कोठलीही गोष्ट या वस्तूपासून भिन्न नसेल. अर्थातच ही वस्तूपरिच्छेदशून्यता अद्वैताकडे निर्देश करते.
म्हणजे जर एखादी गोष्ट या तीनही बध्दांतांच्या पलीकडे असेल तर ती स्थलातीत, कालातीत आणि अद्वैत असेल. हाच अद्वैत वेदांतानुसार 'अनंत' या शब्दाचा अर्थ आहे. जर एखादी गोष्ट अशी अनंत असेल तर तेथे दुसरी कोणतीही गोष्ट असणे शक्य नाही. ज्यावेळी आपल्याला आपल्या या अनंतस्वरूपाचा बोध होईल तेव्हा आपण या आयुष्यातील दु:खांच्या पलीकडे जाऊ.
माझ्यासह आपणा सर्वांना आपल्या या अनंतस्वरूपाचा या जन्मताच बोध व्हावा ही परमेश्वराचरणी प्रार्थना.
Wednesday, October 26, 2022
Wednesday, October 12, 2022
लेणी
ऐतिहासिक नाणेघाटला जाताय? तर आवश्य वाचाच.
Sunday, September 4, 2022
माझे ठाणे
१> इसवी सनाच्या नवव्या शतकात शिलाहार साम्राज्याच्या बिंब राजाने आपली राजधानी महिकावतीहून (केळवे माहीम) ठाण्याला हलविली.
२> राजाने आपल्या हत्तींना पोहण्यासाठी तेथील तलाव खोदून मोठा केला. तोच सध्याचा मासुंदा तलाव. त्याच्या काठाशी असलेलया भव्य शिवमंदिरासमोर आपला राजवाडा बांधला. मासुंदा तलावाची हद्द पूर्वी (स्वातंत्र्याच्यावेळी) पूर्वेला कौपिनेश्वर मंदिरापासून पश्चिमेला हनुमान व्यायामशाळेपर्यंत आणि उत्तरेला मुंबई रस्त्यापासून दक्षिणेला मो.ह.विद्यालयापर्यंत होती. मुंबई रस्ता हा देवळांचा रस्ता होता. हा रस्ता प्राचीन काळापासून ठाणे बंदराला उत्तर भारताशी जोडणारा रस्ता होता. याच रस्त्यावर सम्राट अशोकाने अशोक स्तंभ बसविला होता. स्वातंत्र्यानंतर मासुंदा तलावाचा पूर्वेकडील भाग बुजवून तेथे उद्यान आणि शिवाजी पथ करण्यात आला. तसेच तलाव काही प्रमाणात बुजवून तलावाच्या सर्व बाजूस रस्ता करण्यात आला. तसेच तलावाच्या मध्यभागात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला.
३> बिंब राजा शिवभक्त असल्याने त्याने ठाण्यात साठ तलाव खोदून त्याकाठी शिवमंदिरे बांधून घेतली. तेव्हापासून ठाणे 'षष्टीस्थानाक' म्हणून ओळखले जाऊ लागले. १९७५ च्या सुमारास यातील अनेक तलाव महानगरपालिकेने बुजवून त्यावर रस्ते/बागा/इमारती बांधल्या. उदारणार्थ घंटाळी देवीच्या बाजूचे मैदान हा एक विस्तीर्ण तलाव (घंटाळी तलाव) होता. तो सहयोग मंदिरापर्यंत पसरलेला होता. आजचे रंगायतन आणि शिंदे तरणतलाव याच सुमारास तळे (मासुंदा तलाव) बुजवून बांधला गेला आहे.
४> पोर्तुगीज राजवटीत मुंबई रस्त्यावरील देवळे पाडून त्यातील मूर्ती मासुंदा तलावात टाकून त्यावर 'सेंट जॉज चर्च' बांधण्यात आले. आजही मुंबई रस्त्यावरील घरांचे पुनर्बांधणी होताना जमिनीत गाडल्या गेलेल्या प्राचीन मूर्ती सापडतात.
५> पहिल्या बाजीरावाचे भाऊ चिमाजीअप्पा यांनी ठाणे-वसई यावरील पोर्तुगीज राजवट समाप्त करण्याचे ठरविले. तेव्हा ठाण्यातील येऊर येथील एका टेकडीवरून या किल्ल्याची आणि परिसराची पाहणी केली होती. आजही या ठिकाणावरून वसईचा किल्ला दिसतो. याच लढाईच्या वेळी मराठ्यांचे 'महागिरी' हे जहाज ठाण्याच्या खाडीत रुतून बसले. त्या भागाला नंतर महागिरी हेच नाव पडले.
६> ठाण्याचा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला. हा एक भक्कम किल्ला म्हणून ओळखला जात होता. तो ब्रिटिशांचे हातात आल्यावर त्याचा तुरुंग म्हणून वापर झाला. या किल्ल्याचे एक दार (त्या काळी) थेट खाडीत उघडत असल्याने या किल्ल्यातून अंदमानला नेले जाणारे कैदी नेत असत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना याच किल्ल्यातून अंदमानला नेले होते. अनंत कान्हेरे आणि त्यांच्या क्रांतिकारक साथीदारांना याच किल्ल्यात इंग्रजांनी फाशी दिले होते. या किल्ल्यात आजही खतरनाक कैदी ठेवले जातात.
७> ठाण्याचे मीठबंदर हे एके काळी अत्यंत नावाजलेले बंदर होते. येथून मुख्यतः: मीठाचा व्यापार चालत असे. ठाण्यातील घोडबंदर येथे अरबी घोडे उतरवून घेतले जात. घोडबंदर येथे एक किल्लाही आहे.
८> ठाण्यातील मूळ जमात म्हणजे आगरी आणि कोळी. चेंदणी भागात कोळीवाडा आहे. तेथेच ठाण्याची मूळ ग्रामदेवता आहे. बिंब राजाने राज्यकारभार सांभाळण्यासाठी त्यात प्राविण्य मिळविलेल्या काश्मीरमधील चिनाब नदीच्या (चांद्रशोणा) खोऱ्यातील कायस्थांना आणि गुजरातमधील पाठारेंना येथे आणले. त्यांना 'प्रभू' ही पदवी दिली. त्यातील कायस्थ (चांद्रसेनीय कायस्थ प्रभू) ठाण्यात आणि आसपासच्या परिसरात स्थायिक झाले. पाठारे प्रभू मुंबईला स्थायिक झाले.
९> ठाणे हे अर्वाचीन युगात महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळखले जाते. जनकवी पी. सावळाराम हे ठाण्याचे नगराध्यक्ष होते. नावाजलेले क्रिकेटपटू खंडू रांगणेकर हे ठाण्यातीलच. ठाण्याचे मराठी ग्रंथ संग्रहालय हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या मराठी वाचनालयांपैकी एक आहे.