Tuesday, December 6, 2022

जन्म-पुनर्जन्म

 अद्वैत तत्वज्ञानानुसार मृत्यूनंतर माणसाचे चैतन्य (म्हणजे आपण) कोठेही जात नाही. कारण मुळात चैतन्य हे सर्वव्यापी आहे. म्हणजेच आपल्याला पुनर्जन्म नाही. जर जन्मच नसेल तर पुनर्जन्म कसा असेल?

चैतन्याची मनात पडलेली प्रतिमा आपल्या अंत:करणाच्या अहंकार भागाशी तादात्म्य पावते आणि आपल्या चेतासंस्थेमार्फत सर्व शरीरात पसरते. ही चैतन्याची प्रतिमा चेतासंस्थेमार्फत देहात पसरत असल्याने आपल्याला आपला देह चैतन्यमय जाणवतो. ही प्रतिमा अंत:करणाच्या 'अहंकार' या भागाशी तादात्म्य पावत असल्याने आपल्याला ही चैतन्याची प्रतिमा म्हणजे 'आपला' आत्मा वाटते. एखाद्या स्वच्छ लोलकाशेजारी लाल जास्वदांचे फुल ठेवले तर लोलकाचा रंग लाल भासतो (याला शास्त्रात 'उपाधी' असे नाव आहे). खरे तर लोलक रंगहीनच असतो. परंतु लाल फुलाच्या सानिध्यामुळे तो लाल आहे असे भासते. तद्वतच मनाच्या सानिध्यामुळे मनात येत असलेल्या भावना - राग, लोभ, सुख, दु:ख - या आपल्या चैतन्यात उगम पावल्या आहेत असे आपल्याला वाटते. खरे तर त्या रंगहीन लोलकासारखे आपले चैतन्य निरंजन असते- त्यावर कोठलाही परिणाम झालेला नसतो. आपण म्हणजे आपले चैतन्य निर्विकारच असते.
आपल्या देहाच्या मृत्यूनंतर आपले सूक्ष्म शरीर अन्य देहात जाते. सूक्ष्म शरीर हे एकोणीस घटकांचे बनलेले असते. पाच ज्ञानेंद्रियांच्या (नाक, कान, डोळे, त्वचा, जीभ) शक्ती, पाच कर्मेंद्रियांच्या (तोंड, पाय, हात, गुदद्वार, लैगिक इंद्रिये) शक्ती, पंचप्राण (प्राण, आपण, समान, उदान, व्यान), अंत:करणाचे चार भाग (मन, बुद्धी, अहंकार, चित्त) असे हे एकोणीस घटक आहेत. अंत:करणाच्या चार भागांसोबत आपण मिळवलेले ज्ञान, आपल्या वासना, कर्मे इत्यादी पुढील जन्मात जातात. मात्र आपण - म्हणजेच आपले चैतन्य कोठेही जात नाही. जसे एखादे स्वप्न आपल्या मनात घडते तसे हे जन्म आणि पुनर्जन्म आपल्या चैतन्यातच घडत असतात. जसे झोपेतून उठल्यावर (जागृतावस्थेची जाणीव झाल्यावर)आपले स्वप्न संपते तसेच आपल्याला आपल्या ब्रह्मस्वरूपाची -तुर्यावस्थेची-जाणीव झाल्यावर हे आपल्या सूक्ष्म देहाचे जन्म-पुनर्जन्माचे रहाटगाडे थांबते.
मला आणि आपणा सर्वांना या जन्मातच आपल्या ब्रह्मस्वरूपाची जाणीव होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
संतोष कारखानीस ठाणे

Monday, December 5, 2022

अनंत : अद्वैत वेदांताची संकल्पना

 वेदांतानुसार आपण अनंत आहोत. मात्र मायेच्या प्रभावामुळे आपल्याला आपण बद्ध झाल्यासारखे वाटते. 

ही  बद्धता तीन प्रकारची असते. 

१> एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी असेल तर ती अन्य ठिकाणी असणे शक्य नाही. म्हणजेच त्या वस्तूला स्थलाचे (space) बंधन आहे.  आपण आता आपल्या घरी आहोत, म्हणजेच अन्य ठिकाणी असणार नाही, रस्त्यावर असणार नाही. याला प्राचीन भाषेत 'देशपरिच्छेद:' असे म्हणतात. परिच्छेदाचा शब्दश: अर्थ 'कापणे' आहे. या अवकाशाचे विभाजन केले तर या ठिकाणी तुम्ही आहात. (किंवा तुमच्यामुळे या अवकाशाचे विभाजन झालेले आहे). जे देशापरिच्छेद करत नाही म्हणजेच एकाचवेळी सर्वठिकाणी असते (Omnipresent) त्याला 'देशापरिच्छेदशून्य' असे म्हणतात. अद्वैत वेदांतानुसार ब्रह्म हे  देशापरिच्छेदशून्य आहे.. 

२> दुसऱ्या प्रकारची बद्धता हे काळासंदर्भात असते. प्रत्येक वस्तू ही काही ठराविक काळातच अस्तित्वात असते. लहान कीटक काही काळ अस्तित्वात असतात, मानव कदाचित शंभर वर्षे  अथवा त्याच्या आसपासच्या काळापर्यंत अस्तित्वात राहू शकेल, तारे कदाचित काही कोटी वर्षे अस्तित्वात राहू शकतील. पण याला काही मर्यादा आहे. याला प्राचीन भाषेत 'कालपरिच्छेद:' असे म्हटले आहे. बुद्धाच्या मते ज्याची सुरुवात आहे त्याला अंतही आहे. जे कालाचे विभाजन करीत नाही, म्हणजेच अनंत काल उपलब्ध होते आणि राहणार आहे त्याला कालपरिच्छेदशून्य (Omnipresent) असे म्हटले आहे. अद्वैत वेदांतानुसार ब्रह्म हे कालपरिच्छेदशून्य आहे. 

३> तिसरी बध्दता ही नाम-रूपासंबंधी (Object) आहे.  एखादी वस्तू ही ती वस्तूच आहे आणि अन्य काहीही नाही. हे म्हणजे एखाद्या वस्तूला तिचे विशेषत्व देण्यासारखे आहे (Law of idendity). एखादी वस्तू 'अ' आहे याचाच अर्थ ती 'ब' 'क' इत्यादींपासून वेगळी आहे.  मी 'संतोष कारखानीस ' आहे याचाच अर्थ मी अन्य कोट्यवधी माणसांपासून वेगळा आहे.  मला - माझ्या या देहाला आधार कार्ड क्रमांक मिळाला की मी आपोआप अन्य देहांपासून वेगळा ओळखला जातो.  हा आहे 'वस्तूपरिच्छेद:'. एखादी गोष्ट वस्तुपरिचछेदशून्य असेल तर याचाच अर्थ अन्य कोठलीही गोष्ट या वस्तूपासून भिन्न नसेल. अर्थातच ही वस्तूपरिच्छेदशून्यता अद्वैताकडे निर्देश करते. 

म्हणजे जर एखादी गोष्ट या तीनही बध्दांतांच्या पलीकडे असेल तर ती स्थलातीत, कालातीत आणि अद्वैत असेल. हाच अद्वैत वेदांतानुसार 'अनंत' या शब्दाचा अर्थ आहे. जर एखादी गोष्ट अशी अनंत असेल तर तेथे दुसरी कोणतीही गोष्ट असणे शक्य नाही. ज्यावेळी आपल्याला आपल्या या अनंतस्वरूपाचा बोध होईल तेव्हा आपण या आयुष्यातील दु:खांच्या पलीकडे जाऊ. 

माझ्यासह आपणा सर्वांना आपल्या या अनंतस्वरूपाचा या जन्मताच बोध व्हावा ही परमेश्वराचरणी प्रार्थना. 

Wednesday, October 12, 2022

लेणी

 ऐतिहासिक नाणेघाटला जाताय? तर आवश्य वाचाच.

मित्रांनो आपण जर जुन्नर तालुक्यातील जुन्नर ते नाणेघाट प्रवास करत असाल तर आपण लेख आवश्य एकदा वाचा व खालील ऐतिहासिक वारसा क्रमानुसार नक्कीच पहायला विसरू नका.
१) *माणमोडी बौद्ध लेणी समूह.*
किल्ले शिवनेरी च्या पुर्वेस पुर्व- पश्चिम पसरलेल्या डोंगररांगेस माणमोडी डोंगर असुन या डोंगरात तीन लेणी समूह पहायला मिळतात.
१)अंबा अंबिका लेणी समूह
२) भिमाशंकर लेणी समूह
३)भूतलिंग लेणी - समूह हा जुन्नरच्या मानमोडी डोंगरात आहे . मानमोडी लेणी समूहातील लेण्यांपैकी लेणे क्र . 40 हे भूत लेणी चैत्यगृह असून हे जुन्नरमधील सर्वात देखणे दर्शनी भाग असलेले आहे . चैत्यकमानीवर पंचफणाधारी नागराज , मनुष्यरूपातील गरुड शिल्प कोरले आहे . या शिल्पांना स्थानिक लोक भुते , तर त्यांच्या बाजूस असलेल्या स्तूपांना लिंग समजत . यावरून या लेण्यास ‘ भूत ' किंवा ' भूतलिंग ' असे नाव पडले असे म्हटले जाते .
२) *किल्ले शिवनेरी*
शिवनेर किंवा कुकडनेर या खोऱ्यामध्ये शिवनेरी हा प्राचीन किल्ला आहे . हा किल्ला महान मराठा राजा श्री. शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे . याच्या पायथ्याला जुन्नर गाव आहे . या दुर्गावर शिवाई देवीचे मंदिर , गंगाजमना टाकं , शिवकुंज , शिवजन्मस्थान इमारत आणि तिन्ही बाजूंना कोरीव लेणी आहेत . संपूर्ण देशातून असंख्य शिवप्रेमी व पर्यटक दर्शनासाठी वर्षभर या किल्याला भेट देतात .
३) तुळजाभवानी बौद्ध लेणी समूह
जुन्नर शहरापासून पश्चिमेस ४कि.मी अंतरावर आपणास हा तुळजाभवानी लेणी समूह पहायला मिळतो. महाराष्ट्रातील सर्वात प्रथम कोरलेला हा लेणी समूह असुन येथील १२ खांबावर तबकडीच्या आकाराची तरलेली लेणी ही विशिष्ट प्रकारची असुन ती इतरत्र कुठेही पहावयास मिळत नाही.
४) *किल्ले चावंड*
जुन्नरच्या पश्र्चिमेला नाणेघाट डोंगररांगेतील उत्कृष्ट कातळ अंड्यांची सुंदर भौगोलिक रचना असलेला अर्थात किल्ले चावंड हा गिरिदुर्ग आहे . किल्लूयावर पुष्करणी, सरकारी वाडा, धान्य कोठार व पाण्याच्या टाक्या आहेत. सप्तमातृका टाक्या पाहुन किल्याचा काही आगळावेगळा इतिहास असावा असे वाटते. किल्यावर चावंडा देवीचे मंदिर आहे . गडावरून कोकणातील विस्तृत प्रदेश पाहता येतो , माणिकडोह धरण, किल्ले हडसर, किल्ले निमगिरी आणि परीसराचे दर्शन सुरेख होते . हा गिरिदुर्ग जुन्नरचा महत्वाचा भू - वारसा आहे .
५) *कुकडेश्वर मंदिर* Kukadeshwar Temple
कुकडेश्ववर शिवालय हे महाराष्ट्रातील पुरातन काळी बांधलेल्या दगडी मंदिरांपैकी एक आहे . अखंड दगडात केलेले कोरीव काम आणि स्थापत्य कलेचा उत्तम आविष्कार असलेले हे मंदिर तुलनेने अप्रसिद्ध आहे . नवव्या शतकातील शिलाहारवंशीय झंझ राजाने हे मंदिर बांधले . या मंदिरापासून कुकडी नदीचा उगम होतो . चुन्याचा वापर न करता एकावर एक दगड रचून हे मंदिर तयार केले गेले .
६) *ऐतिहासिक नाणेघाट*
नाणेघाट परिसर कोकणपट्टी आणि देश यांच्यामध्ये उभ्या असणाऱ्या सह्याद्रीतून माणसांची अन् वाणसामानाची ने - आण करण्यासाठी एका उत्तम घाटवाटेची निर्मिती सातवाहनांच्या साम्राज्याने नाणेघाटाच्या रुपात केली . या घाटमाथ्यावर ' नानाचा अंगठा ' नावाचा सुळका आहे . त्याला खेटूनच सुमारे ६० मी . लांबीचा अन् २ ते ५ मी . रुंदीचा नाणेघाट हा खोदीव नळीचा किंवा बोळीचा भाग आहे . त्याकाळच्या व्यापारी मालावर याठिकाणी जकात आकारली जात असे. त्यासाठी येथे लेण्या कोरलेल्या असुन त्याच लेणित २२०० वर्षांपूर्वी शिलाले कोरण्यात आला असून विविध दाणधर्माचा त्यात उल्लेख केला आहे व हाच शिलालेख मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा सर्वात मोठा पुरावा मानला जातो.
७) *किल्ले जीवधन* - वांदरलिंगी सुळका Jeevdhan Fort - Vandarlingi Pinnacle
जुन्नरच्या पश्र्चिमेला नाणेघाट डोंगररांगेतील मुकुटमणी अर्थात किल्ले जीवधन हा गिरिदुर्ग आहे . किल्लूयावर गजलक्ष्मीचं शिल्प आहे . गावकरी याला कोठी असे संबोधतात . किल्यावर जीवाई देवीचे मंदिर आहे . गडावरून कोकणातील विस्तृत प्रदेश पाहता येतो , वांदरलिंगी सुळक्याचे व नाणेघाटाचे दर्शन सुरेख होते . हा गिरिदुर्ग आणि सुळका जुन्नरचा महत्वाचा भू - वारसा आहे .
संपूर्ण लेख हा copyright ©️ असुन आपण संपूर्ण माहिती व नावासहीतच प्रसारीत करू शकता.
लेख/ छायाचित्रे - श्री रमेश खरमाळे, माजी सैनिक
मो. नं. ८३९०००८३७०

Sunday, September 4, 2022

माझे ठाणे

 १> इसवी सनाच्या नवव्या शतकात शिलाहार साम्राज्याच्या बिंब राजाने आपली राजधानी महिकावतीहून (केळवे माहीम) ठाण्याला हलविली. 

२> राजाने आपल्या हत्तींना पोहण्यासाठी तेथील तलाव खोदून मोठा केला. तोच सध्याचा मासुंदा तलाव. त्याच्या काठाशी असलेलया भव्य शिवमंदिरासमोर आपला राजवाडा बांधला. मासुंदा तलावाची हद्द पूर्वी (स्वातंत्र्याच्यावेळी) पूर्वेला कौपिनेश्वर मंदिरापासून पश्चिमेला हनुमान व्यायामशाळेपर्यंत आणि उत्तरेला मुंबई रस्त्यापासून दक्षिणेला मो.ह.विद्यालयापर्यंत होती. मुंबई रस्ता हा देवळांचा रस्ता होता. हा रस्ता प्राचीन काळापासून ठाणे बंदराला उत्तर भारताशी जोडणारा रस्ता होता. याच रस्त्यावर सम्राट अशोकाने अशोक स्तंभ बसविला होता. स्वातंत्र्यानंतर मासुंदा  तलावाचा पूर्वेकडील भाग बुजवून तेथे उद्यान आणि शिवाजी पथ करण्यात आला. तसेच तलाव  काही प्रमाणात बुजवून तलावाच्या सर्व बाजूस रस्ता करण्यात आला. तसेच तलावाच्या मध्यभागात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला. 

३> बिंब राजा शिवभक्त  असल्याने त्याने ठाण्यात साठ तलाव खोदून त्याकाठी शिवमंदिरे बांधून घेतली. तेव्हापासून ठाणे 'षष्टीस्थानाक' म्हणून ओळखले जाऊ लागले. १९७५ च्या सुमारास यातील अनेक तलाव महानगरपालिकेने बुजवून त्यावर रस्ते/बागा/इमारती बांधल्या. उदारणार्थ घंटाळी देवीच्या बाजूचे मैदान हा एक विस्तीर्ण तलाव (घंटाळी तलाव) होता. तो सहयोग मंदिरापर्यंत पसरलेला होता. आजचे रंगायतन आणि शिंदे तरणतलाव याच सुमारास तळे (मासुंदा तलाव) बुजवून बांधला गेला आहे. 

४> पोर्तुगीज राजवटीत मुंबई रस्त्यावरील देवळे पाडून त्यातील मूर्ती मासुंदा तलावात टाकून त्यावर 'सेंट जॉज चर्च' बांधण्यात आले. आजही मुंबई रस्त्यावरील घरांचे पुनर्बांधणी होताना जमिनीत गाडल्या गेलेल्या प्राचीन मूर्ती सापडतात. 

५> पहिल्या बाजीरावाचे भाऊ चिमाजीअप्पा यांनी ठाणे-वसई यावरील पोर्तुगीज राजवट समाप्त करण्याचे ठरविले. तेव्हा ठाण्यातील येऊर येथील एका टेकडीवरून या किल्ल्याची आणि परिसराची पाहणी केली होती. आजही या ठिकाणावरून वसईचा किल्ला दिसतो. याच लढाईच्या वेळी मराठ्यांचे 'महागिरी' हे जहाज ठाण्याच्या खाडीत रुतून बसले. त्या भागाला नंतर महागिरी हेच नाव पडले. 

६> ठाण्याचा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला. हा एक भक्कम किल्ला म्हणून ओळखला जात होता. तो ब्रिटिशांचे हातात आल्यावर त्याचा तुरुंग म्हणून वापर झाला. या किल्ल्याचे एक दार (त्या काळी) थेट खाडीत उघडत असल्याने या किल्ल्यातून अंदमानला नेले जाणारे कैदी नेत असत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना याच किल्ल्यातून अंदमानला नेले होते. अनंत कान्हेरे आणि त्यांच्या क्रांतिकारक साथीदारांना याच किल्ल्यात इंग्रजांनी फाशी दिले होते. या किल्ल्यात आजही खतरनाक कैदी ठेवले जातात. 

७> ठाण्याचे मीठबंदर हे एके काळी अत्यंत नावाजलेले बंदर होते. येथून मुख्यतः: मीठाचा व्यापार चालत असे. ठाण्यातील घोडबंदर येथे अरबी घोडे उतरवून घेतले जात. घोडबंदर येथे एक किल्लाही आहे. 

८> ठाण्यातील मूळ जमात म्हणजे आगरी आणि कोळी. चेंदणी भागात कोळीवाडा आहे. तेथेच ठाण्याची मूळ ग्रामदेवता आहे.  बिंब राजाने राज्यकारभार सांभाळण्यासाठी त्यात प्राविण्य मिळविलेल्या काश्मीरमधील चिनाब नदीच्या (चांद्रशोणा) खोऱ्यातील कायस्थांना आणि गुजरातमधील पाठारेंना येथे आणले. त्यांना 'प्रभू' ही पदवी दिली. त्यातील कायस्थ (चांद्रसेनीय कायस्थ प्रभू) ठाण्यात आणि आसपासच्या परिसरात स्थायिक झाले. पाठारे प्रभू मुंबईला स्थायिक झाले. 

९> ठाणे हे अर्वाचीन युगात महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळखले जाते. जनकवी पी. सावळाराम हे ठाण्याचे नगराध्यक्ष होते. नावाजलेले क्रिकेटपटू खंडू रांगणेकर हे ठाण्यातीलच. ठाण्याचे मराठी ग्रंथ संग्रहालय हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या मराठी वाचनालयांपैकी एक आहे.