Friday, April 24, 2020

गुरु

whatsapp वरून साभार 
तो धिटाईने वृद्ध गुरु समोर उभा होता. गुरु त्यांच्या अनुभवी नजरेने त्याचे निरीक्षण करत होते.
कोवळं वय. असेल साधारण नऊ दहा वर्षाचा. त्याला डावा हातच नव्हता. एका अपघाताने तो हिरावून घेतला होता म्हणे.
" तुला माझ्या कडून काय हवे आहे?" गुरूने त्या मुलाला विचारले.
"सर, मला तुमच्या कडून ज्युडो-कराटेची विद्या शिकायची आहे!"
शरीराला एक हातच नाही आणि ज्युडो शिकायचं आहे? अजब मुलगा दिसतोय.
"कशाला?"
"शाळेत मला मुलं त्रास देतात. थोटक्या म्हणून चिडवतात. मोठी माणस नको तितकी किंवा करतात. मला त्यांच्या या वागण्याचा त्रास होतो! मला माझ्या हिमतीवर जगायचंय! कोणाची दया नको. हात नसताना मला माझं रक्षण करता आलं पाहिजे!"
"ठीक! पण मी आता तो 'शिक्षण' देणारा गुरु राहिलो नाही. मी आता वृद्ध झालोय आणि आत्मचिंतनात मग्न असतो. तुला माझ्या कडे कोणी पाठवलं?"
"सर, मला एक हात नसल्याने खूप जणांनी त्यांच्या 'विद्यार्थी' म्हणून नाकारलं. त्यातल्याच एकाने तुमचे नाव सांगितले. 'तुला फक्त तेच शिकवू शकतील. कारण त्यांना खूप वेळ असतो आणि त्यांच्याकडे एकही विद्यार्थी नाही!' असे ते म्हणाले होते."
'तो उन्मत्त शिक्षक' कोण हे गुरूंनी तात्काळ ताडले. अश्या अहंकारी माणसानंमुळेच हि विद्या गुंड प्रवृत्तीच्या हाती गेली. याचे त्यांना नेहमीच वाईट वाटे.
"ठीक आहे. आज पासून तुला मी माझा 'शिष्य' करून घेत आहे. या शिष्यत्वाचे नियम तुला आज पहिल्यांदा आणि शेवटचे सांगतो. लक्षात ठेव. आपल्या गुरूवर पूर्ण विश्वास ठेवायचा. मी माझ्या लहरी प्रमाणे शिकवीन ते शिकून घ्यायचे. ज्युडो-कराटेहि खूप घातक विद्या आहे. तिच्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो! म्हणून हि विद्या फक्त आत्मरक्षणासाठीच वापरायची. नेहमी नम्र रहायचे. समजले?"
"हो सर. समजले. मी आपल्या या आज्ञांचे पालन करीन."  ्मुलाने गुरूच्या पायावर डोके ठेवले.
आणि आपल्या एकुलत्या एक शिष्याच्या शिक्षणास त्यांनी आरंभ केला.
एकच डाव गुरूंनी त्याला शिकवला आणि तोच, तोच ते त्याच्याकडून करून घेऊ लागले. सहा महिने हेच चालू राहिले. एक दिवशी मुलाने गुरूचा चांगला मूड बघून हळूच विषय काढला.
"सर, सहा महिने झालेत. एकच मूव्ह तुम्ही माझ्या कडून करून घेत आहात. नवीन डाव असतीलच ना?"
"आहेत! अनंत डाव आहेत! ते आत्मसात करायला, तुला तुझं आयुष्य कमी पडेल! पण तुला मी शिकवतो आहे त्याचीच गरज आहे. आणि इतकेच तुझ्या साठी पुरेसे पण आहे!"
गुरुवचनावर विश्वास ठेवून तो शिकत राहिला.
                                                                                                                                                    ०००
बरेच दिवसानंतर ज्युडोचे टुर्नामेंटस जाहीर झाले. गुरूंनी आपला एकमेव शिष्य यात उतरवला.
पहिले दोन सामने त्या शिष्याने सहज जिंकले!
पहाणारे आश्चर्यचकित झाले. एक हात नसलेला मुलगा जिंकलाच कसा? कोण गुरु असावा?
तिसरा सामना थोडासा कठीण होता, पण त्या मुलाची सफाईदार आणि वेगवान हालचालींनी तो हि सामना त्यानेच जिंकला!
आता त्या मुलाचा आत्मविश्वास बळावला. आपणहि जिंकू शकतो! हि भावना त्याला बळ देत होती.
बघता बघता तो अंतिम सामन्यात पोहंचला.
ज्या शिक्षकाने, त्या मुलास म्हाताऱ्या गुरुकडे पाठवले होते, त्या अहंकारी माणसाचा शिष्यच, त्या मुलाचा अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धी होता!
प्रतिस्पर्धी त्या मुलाच्या मानाने खूपच बलवान होता. वयाने, शक्तीने, अनुभवाने सरस होता. या कोवळ्या वयाच्या पोराला तो सहज धूळ चारणारे हे स्पष्ट दिसत होते. पंचानी एकत्र येऊन विचार केला.
"हा सामना घेणे आम्हास उचित वाटत नाही. कारण प्रतिस्पर्धी विजोड आहेत. एक बलवान आणि एक दिव्यांग आहे. हा सामना मानवतेच्या आणि समानतेच्या दृष्टिकोनातून आम्ही थांबवू इच्छितो. प्रथम जेते पद विभागून देण्यात येईल! अर्थात दोन्ही प्रतिस्पर्धी यास तयार असतील तरच." मुख्य पंचाने आपला निर्णय जाहीर केला.
"मी या चिरगुट पोरा पेक्षा, मी श्रेष्ठ आहे यात दुमत असण्याचे कारण नाही. हे सगळ्यांना स्पष्ट दिसतच आहे. तेव्हा मला विजेता आणि या पोराला उपविजेता म्हणून घोषित करावे!" तो प्रतिस्पर्धी उग्रपणे म्हणाला.
"मी लहान असेन. तरी मला हे टाकलेले उपविजेतेपत नको आहे! माझ्या गुरूंनी प्रामाणिकपणे लढण्याचे शिक्षण दिलेले आहे. मी ठरलेला सामना खेळून जे माझ्या हक्काचे जेते पद आहे ते स्वीकारीन!" त्या लढवय्याने उत्तर ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
जाणकारांच्या कपाळावर मात्र आठ्या पडल्या. कारण हे ओढवून घेतलेले संकट होते. थोडे कमी ज्यास्त झाले तर? आधी एक हात नाही अजून एखादा अवयव गमावला जायचा! मूर्ख मुलगा!
सामना सुरु झाला.
--- आणि सगळी मंडळी आश्चर्याने स्तिमित झाली. त्या एका अनमोल क्षणी त्या अपंग मुलाची जीवघेणी थ्रो केलेली किक, त्या बलवान प्रतिस्पर्ध्याला चुकवता आली नाही. तो रिंगणाबाहेर फेकला गेला. परफेक्ट थ्रो, परफेक्ट टाईमिंग, नेमका लावलेला फोर्स! अप्रतिम! केवळ अप्रतिम!
                                                                                                                                               ००००
गुरुगृही पोहंचल्यावर, त्या मुलाने आपल्या उजव्या हातातली विजयाची ट्रॉफी गुरुजींच्या पायाशी ठेवली. त्यांना पायावर डोके ठेवून आपली पूज्य भावना व्यक्त केली.
"सर, एक शंका आहे. विचारू?"
"विचार."
"मला फक्त एकच डाव/ मूव्ह येते. तरीही मी कसा जिंकलो?"
"तू दोन गोष्टी मुळे जिंकलास!"
"कोणत्या,सर?"
"एक तू घोटून, न कंटाळता केलेला सराव! त्या मुळे तुझा तो डाव 'सिद्ध' झाला आहे, आत्मसात झाला आहे! त्यात चूक होणे अशक्य आहे!"
"आणि दुसरे कारण?"
"दुसरे कारण हे, त्याहून महत्वाचे आहे. प्रत्यक डावाचा एक प्रतिडाव असतो! तसाच या डावाचाही एक उतारा डाव आहे!"
"मग तो, माझ्या अनुभवी प्रति स्पर्ध्यास माहित नव्हता का?"
"तो त्याला माहित होता! पण तो हतबल झाला, कारण -----कारण या प्रतिडावात, हल्ला करणाऱ्या प्रतिस्पर्ध्याचा डावा हात धरावा लागतो!"
आता तुम्हांसी समजले असेल कि, एक सामान्य, एक हात नसलेला मुलगा कसा जिंकला?
ज्या गोष्टीला आपण आपली कमजोरी समजतो, तिलाच जो आपली शक्ती बनवून जगायला शिकवतो, विजयी व्हायला शिकवतो, तोच खरा गुरु!
आतून आपण कोठे ना कोठे 'दिव्यांग' असतो, कमजोर असतो. त्यावर मत करून जगण्याची कला शिकवणारा 'गुरु' हवा आहे, किमान मला तरी.
आहे का तुमच्या पहाण्यात असा कोणी?

Monday, April 6, 2020

Kamikaze : जपानचा डिव्हाईन विंड


कालच्या दिवे उजळण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी मला जपानच्या १५ ऑगस्ट १२८१ मध्ये घडलेल्या  'डिव्हाईन विंड' ची आठवण झाली.
मंगोल आक्रमक चेंगीझ खान याने चीनचा बराचसा भाग ताब्यात घेतला होता. चीनचा तो सत्ताधीश झाला आणि त्याने आपल्या राजवटीला युआन राजवट (Yuan Dynasty) म्हणजे 'प्रथम सुरुवात' (‘first beginning) असे नाव दिले. त्याचा नातू कुबलईखान हा आपल्या आजोबांसारखाच शूर आणि महत्वाकांक्षी होता. त्याने आपल्या राज्याच्या पश्चिमेला असलेले प्रदेश जिंकून घेतले. मात्र खैबरखिंड ओलांडून भारतभूमीवर आक्रमण करण्याचे धैर्य त्याच्याकडे नव्हते. मग त्याने आपले लक्ष पूर्वेकडे वळविले. केवळ शंभर मैलांवर असलेला जपान त्याला खुणावत होता. त्याने आपणास शरण येण्यासाठी  अनेक खलिते जपानच्या सम्राटास पाठविले. परंतु जपानच्या बलाढ्य लष्कराच्या प्रामुख्याने (शोगुन shogun) हे खलिते राजापर्यंत पोचूच दिले नाहीत. आता मात्र कुबलईखान चिडला. पण जपानचे आरमार अत्यंत बलाढ्य होते. या आरमाराने पूवी कुब्लाईखानाला चांगली लढत देऊन पिटाळून लावले होते. त्यामुळे  कुबलईखानाने मोठी तयारी करूनच हल्ला करण्याचे ठरविले.
हा हल्ला करण्यासाठी मोठे आरमार जवळ असणे आवश्यक होते. त्यासाठी Kamikaze चीनमधील नौका तयार करणाऱ्या सर्वांना कामाला लावले.  कोणाही नौका तयार करणाऱ्याने दुसरे काम हातात घेऊ नये असे फर्मानाच काढले. चीनमधील मोठ्या नद्यांतून खूप वाहतूक होत असल्याने तेथे नौका तयार करणारे कारागीरही खूप होते. बघता बघता दीड वर्षात ४,४०० आरमारी जहाजांचा मोठा ताफा कुबलईखानाकडे तयार झाला. त्यावर त्याने ७०,००० ते १,४०,००० खलाशी आणि नौसैनिक नेमले. या शिवाय आता त्याच्याकडे चिनी लोकांकडूनच शिकलेली एक विद्या होती. त्याने बंदुकीची दारू वापरून बॉम्ब (जळते गोळे) तयार केले होते. हे गोळे फेकण्यासाठी मोठ्या लाकडी गलोली त्याने या जहाजांवर उभारल्या होत्या. आजवर असे अस्त्र कोणी वापरले नव्हते. अशा तयारीनिशी हल्ला केल्यावर जपानी सहज शरण येतील अशी कुबलईखानाल खात्री होती. १२८१च्या ऑगस्टमध्ये हे महाप्रचंड आरमार जपानवर हल्ला करण्यास हाकता समुद्रधुनीतून निघाले.
जपानमध्ये सर्व व्यवहार सुरळीत चालू होते. किनाऱ्यावर त्यांचे पारंपरिक सामुराई योद्धे आपल्या पारंपरिक शस्त्रांसह गस्त घालीत होते. अचानक त्यांना क्षितिजावर शिडे दिसू लागली. शिडांची संख्या पाहून ते चक्रावून गेले. जपानवर आता खूप मोठा हल्ला होत आहे याची त्यांना खात्री झाली. तेवढ्यात त्यांच्यावर क्षितिजावरून जळत्या गोळ्यांचा मारा सुरु झाला. अजून हे जळते गोळे किनाऱ्यापर्यंत पोचत नव्हते. पण लवकरच या बोटी जवळ आल्या की ते पोचणार होते. जपानी लोकांकडे या शस्त्रावर उत्तर नव्हते. ते पारंपरिक शस्त्रांत प्रवीण होते.  त्याकाळी जपानमधील बहुसंख्य घरे (भूकंपापासून संरक्षण करण्यासाठी) लाकडाची होती. त्यामुळे या जळत्या गोळ्यांमुळे संपूर्ण जपान बेचिराख झाले असते. संध्याकाळ झाली. आता दुसऱ्या दिवशी सकाळी खूप मोठा हल्ला होणार हे स्पष्ट होते. जपानच्या सम्राटाने सर्व नागरिकांना देवळात जाऊन देवाची प्रार्थना आणि घंटानाद करण्यास सांगितले. ती  रात्र जपानचे सर्व नागरिक देवळात घंटानाद करीत होते. पूर्व दिशा उजळू लागली. गस्त घालणारे सामुराई योद्धे चिंतेने समुद्राकडे बघू लागले. पण आश्चर्य म्हणजे आता बोटींची शिडे दिसत नव्हती. रात्री खूप मोठे वादळ (टायफून) येऊन कुबलईखानाच्या आरमाराला जलसमाधी मिळाली होती. जपानी माणसे अत्यानंदाने परत देवळात गेली आणि घंटानाद करून देवाचे आभार मानू लागली. घंटानाद जपानच्या दशदिशांत भरून राहिला. त्या दिवशी आलेल्या वादळाला डिव्हाईन विंड (Kamikaze) या नावाने जपानी लोक ओळखतात. देवानेच हे वादळ पाठविले अशी त्यांची श्रद्धा आहे.
आपण आता त्यावेळी नक्की काय झाले होते ते पाहू. चीनमध्ये (आणि आपल्याकडेही) त्याकाळी बरीचशी वाहतूक नद्यांमधून होत असे. कुब्लाईखानाने ज्यांना बोटी बांधण्यास सांगितले ते बहुतेक नदीतील वाहतुकीसाठी बोटी तयार करणारे होते. नदी समुद्राच्या मानाने उथळ असते, तिच्यातील प्रबळ प्रवाहाला तोंड देऊन बोटींना मार्गक्रमण करावी लागते. त्यांना फारसा वादळाशी सामना करावा लागत नाही. म्हणून या बोटींचे तळ निमुळते असतात. याउलट समुद्रात जाणाऱ्या बोटींना प्रबळ प्रवाहांना तोंड द्यावे लागत नाही, मात्र वादळांशी सामना करावा लागतो. त्यामुळे या बोटींचे तळ सपाट असतात. परंतु बोटी बांधणाऱ्या लोकांना नदीतील बोटी तयार करण्याचे ज्ञान असल्याने त्यांनी निमुळत्या तळ्यांच्या बोटी बांधल्या.  नदीतील बोटी आणि समुद्रातील बोटी यांचे नांगरही  वेगळे असतात. परंतु या बोटींचे नांगर नदीतील बोटींसारखे होते. ते वादळात उखडले गेले. तसेच चिनी समुद्रात ऑगस्टमध्ये मोठी वादळे (टायफून) येतात. परंतु कुब्लाईखान जपानवर हल्ला करण्यास उतावीळ झाल्याने आणि तो आपल्या आरामाराबद्दल अतिविश्वासू असल्याने त्याने ऑगस्टमध्ये ही मोहीम काढली.
आता हे वादळ 'देवाने पाठविले' का 'कर्मधर्म संयोगाने त्याचवेळी वादळ आले' हे प्रत्येकाने आपल्या श्रद्धांनुसार आणि विचारांनुसार ठरवावे. 

Saturday, March 7, 2020

नित्य आणि अनित्य

ब्रह्म 'नित्य' आहे असे अद्वैत वेदांत प्रतिपादन करते. परंतु 'नित्य' शब्दाचा अर्थ आपल्या भाषेत आता वेगळा झाला आहे. आपण 'नित्य' म्हणजे अनंत काल अस्तित्वात राहणारे असा अर्थ घेतो. परंतु ब्रह्म हे कालातीत आहे. कालाला मर्यादा आहे. विश्वाच्या जन्मापूर्वी म्हणजेच बिग बँग पूर्वी काल अस्तित्वात नव्हता. परंतु तेव्हाही ब्रह्म अस्तित्वात होते. जे कालाच्या मर्यादेत नाही ते नित्य अशी ही संकल्पना आहे.
गौतम बुद्धांच्या मते हे विश्व अनित्य आहे, येथील प्रत्येक गोष्ट अनित्य आहे. वेदांत यालाच 'माया' या नावाने संबोधते. जे स्थल आणि कालाच्या मर्यादेत येते- म्हणजेच अनित्य आहे- ती माया आहे आणि माया ही ब्रह्माची एक शक्ती आहे. गौतम बुद्ध 'मायेच्या पलीकडे काही आहे काय' याबद्दल काही सांगत नाहीत. 'हा विषय चर्चा करण्याचा नाही' असे गौतम बुद्धांनी नोंदविले आहे.

Thursday, January 2, 2020

चैतन्य

चैतन्य

चैतन्य या शब्दाला Consciousness हा इंग्रजी प्रतिशब्द म्हणून वापरला जातो. खरेतर  Consciousness हा शब्द इंग्रजीत अत्यंत ढिसाळपणे वापरला जातो. आपले विचार, बोलणे अशा अनेक कृतींनाही हाच शब्द वापरला जातो. परंतु भारतीय तत्वज्ञानात या शब्दाला नेमका अर्थ आहे. आपले बोलावे, वागणे, मनातील विचार इत्यादी गोष्टींना साक्षी असणारे जे असते त्याला चैतन्य असे म्हणतात. याचाच अर्थ चैतन्य हे कधीही एखाद्या वस्तूसारखे (Object) असू शकत नाही. आपण त्याचा अनुभव घेऊ शकणार नाही.  जे अनुभव घेणारे आहे ते चैतन्य. म्हणूनच चैतन्याला 'निर्गुण' म्हटले आहे.

आज आधुनिक विज्ञान चैतन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे.  आजचे Materialistic आणि आपल्याकडील प्राचीन दर्शन 'चार्वाक दर्शन' मानणारे हे चैतन्याचा उगम शरीरात आहे असे मानतात. त्यादृष्टीने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्नही चालू आहे.  मेंदूतील एखाद्या भाग हा चैतन्याचा स्रोत असावा असा त्यांचा अंदाज आहे. त्या दृष्टीने त्यांच्या शोधाचा प्रयत्न चालू आहे.

पण येथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशाप्रकारे हे वैज्ञानिक आपल्या शरीरातील चैतन्याचा स्रोत कदाचित शोधू शकतील. पण तो चैतन्याचा मूळ उगम नव्हे.  जर आपण एखाद्या खोलीत बसलो आहोत आणि तेथे दारातून माणसे जात-येत आहेत म्हणून माणसांचे उगमस्थान त्या खोलीचे दार असत नाही. केवळ त्या खोलीत येण्यासाठी ते दाराचा वापर करतात. चैतन्य हे अनादी आहे. आपल्या शरीरात कदाचित ते मेंदूच्या एका भागातून प्रवेश करीत असेल (तसेही अजून सिद्ध झालेले नाही).

कदाचित शास्त्रज्ञ मन-मेंदू यांच्या संबंधाचा शोध नजीकच्या काळात लावतीलही, परंतु चैतन्य समजून घेणे अजूनही शास्त्राच्या दृष्टीने खूपच लांबचा पल्ला आहे.  त्याताही ही शोध घेण्याची प्रक्रिया चैतन्याच्या परिक्षेत्रातच करावी लागते.  आपल्याला जी अनुभूती होते ती चैतन्यातच होते. त्यामुळे सर्व संशोधन हे चैतन्यातच होते.  म्हणूनच विज्ञानाला चैतन्य समाजणे अधिकच कठीण  किंबहुना अशक्य होते.

विज्ञान हे कार्यकारणभावाच्या (Logistical Reasoning) कक्षेत काम करते. कार्यकारण भाव हा स्थल-कालाच्या मर्यादेत काम करतो. कारण आधी घडते, त्याचे परिणाम नंतर घडतात.  चैतन्य हे आदिम आहे. ते स्थल-कालापलीकडे आहे.  काल आदिम नाही. तो विश्वाच्या जन्मापासून सुरु होतो- आधुनिक विज्ञानानुसार बिग बॅंग पासून सुरु होतो.  विश्वाच्या जन्माच्या आधीच्या गोष्टीचा विज्ञान विचार करू शकत नाही कारण ती स्थल-कालाची पर्यायाने विज्ञानाची मर्यादा आहे.  उपनिषदांच्या मते स्थल-काल हे मायेच्या क्षेत्रात येतात. 

चैतन्य ही संकल्पना अद्वैत वेदांताचा अभ्यास करताना अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. यापुढे अद्वैत वेदान्ताच्या विवेचनात या संकल्पनेची मदत वारंवार घेतली जाईल. 

Monday, November 18, 2019

Problem of Evil आणि कर्मसिद्धान्त

तत्वज्ञानाचा अभ्यास करताना अपरिहार्यपणे एक मुद्दा पुढे येतो. तो तत्वज्ञानात Problem of Evil या नावाने ओळखला जातो.  परमेश्वराची व्याख्या करताना तो  सर्वज्ञ (Omniacient), सर्वशक्तिमान (Omnipotent) , सार्वकालिक (Omnivorous) , आणि चराचरात सामावलेला (Omnopresent) अशी केली जाते.  मग असा सर्वशक्तिमान परमेश्वर जगात असताना जगावर, माणसांवर संकटे येतातच कशी हा प्रश्न अनेकवेळा सर्वसामान्य माणसाला पडतो.  पाश्चात्य धर्मकल्पनांनुसार (Abrahamic religions) परमेश्वरासारखाच एक सैतान आहे अशी कल्पना करून या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातो. तरीही सर्वशक्तिमान परमेश्वर या सैतानाला काबूत का आणू शकत नाही हा प्रश्न उरतोच.
मानवाच्या आदिम अवस्थेत मानवाला सर्वशक्तिमान परमेश्वराची कल्पना सुचली असावी. हा परमेश्वर माणसासारखाच असून प्रसन्न झाल्यास आपले संरक्षण करेल, इच्छापूर्ती करेल, रागावल्यास संकटे निर्माण करेल अशी कल्पना मानवाने केली असावी.  अधिक प्रगती झाल्यावर मानवाने या परमेश्वराला दयाळूपणा जोडला असावा. मग सर्वशक्तिमान आणि दयाळू परमेश्वर असतानाही जगावर आणि आपल्यावर संकटे का येतात अशी शंका निर्माण झाली असणार. पाश्चात्य कल्पनांनुसार या परमेश्वराला तुम्ही शरण जाणे आवश्यक आहे. मगच तो तुमचे संरक्षण करेल.
भारतीय भूमीत मात्र या Problem of Evil ला वेगळे उत्तर शोधले गेले. येथे या प्रश्नाच्या उत्तरासाठी कर्मसिद्धांत मांडला  गेला.  परमेश्वर सर्वशक्तिमान आहे. पण तुम्ही चांगली/वाईट कर्मे केली असतील तर त्यांची फळे तुम्हाला कधीनाकधी भोगावीच लागतील असे हा कर्मसिद्धांत सांगतो. चार्वाक सोडता भारतीय भूमीत जन्मलेल्या सर्व धर्मानी/दर्शनांनी ही कर्मसिद्धांताची कल्पना कोणत्या ना कोणत्या मार्गाने उचलून धरली आहे.  शून्यवाद स्वीकारलेल्या बौद्ध धर्मानेही ही कर्मसिद्धान्ताची कल्पना प्रतीत्यसमुत्पादात संख्ररा (संस्कार) या नावाने स्वीकारली आहे.
मात्र ही कर्मसिद्धान्ताची संकल्पना स्वीकारतानाही एक अडचण निर्माण होते. जीवाच्या जन्माचे कारण मागील कर्मांची फळे भोगणे हे आहे असे सांगितले जाते. जीव कर्माची फळे भोगताना अज्ञानामुळे नवी कर्मे निर्माण करतो आणि ही साखळी चालू राहते असे कर्मसिद्धांत मानतो. जरी कर्मसिद्धांताच्या साखळीची कल्पना मान्य केली तरी ही साखळी मुळात सुरूच का झाली हा प्रश्न उभा राहतो. कर्मसिद्धांतावरील हाच मुख्य आक्षेप आहे.
कर्मसिद्धान्ताची संकल्पना समजावून घेताना 'माया' ही संकल्पनाही समजावून घेणे अपरिहार्य ठरते. माया ही ब्रह्माची शक्ती आहे हे आपण या आधीच्या लेखात पहिले आहे. सर्व विश्व ब्रह्मस्वरूप आहे, मायेच्या आवरणामुळे ते आपल्याला भासमान होते.  आपले मायेसंबंधीचे अज्ञान दूर झाले की ब्रह्म प्रकट होते.  स्थल आणि काल हे मायेचे क्षेत्र आहे. विश्वाच्या आरंभापूर्वी काल नव्हता तसेच स्थल (Space) नव्हते. त्यामुळे तेव्हा मायेचे अस्तित्व नव्हते. मात्र ब्रह्माचे होते.  कार्यकारणभाव हा कालावर अवलंबून असतो. कारण आधी घडावे लागते, मगच कार्य होते. म्हणजेच कार्यकारणभाव हे मायेचे क्षेत्र आहे. कर्म आधी घडावे लागते, त्याची फळे नंतर मिळतात. अर्थात कर्मसिद्धांत हा मायेच्या क्षेत्रात येतो.
माया ही अज्ञानरूपात आहे.  ब्रह्माच्या अज्ञानात मायेचा जन्म आहे. कोणत्याही अज्ञानाला आरंभ नसतो. अंत असू शकतो. उदाहरणार्थ मला रशियन भाषेचे ज्ञान नाही.  'कधीपासून मला रशियन भाषेचे ज्ञान नाही?'  असा प्रश्न उद्भवत नाही.  माझ्या या अज्ञानाला आरंभ नाही.  परंतु अंत असू शकतो. मी रशियन शिकल्यास या अज्ञानाचा अंत होईल. तद्वतच अज्ञानारुपी मायेत जन्म झालेल्या आपल्या कर्मसाखळीला आरंभ नाही. परंतु अंत असू शकतो. आपल्याला  मायेचे खरे स्वरूप कळल्यास या अज्ञानाचा अंत होईल. आपली कर्मसाखळी तुटून आपण मुक्त होऊ.
आपल्या सर्वांना मायेच्या स्वरूपाचा बोध व्हावा आणि आपली कर्मसाखळी तुटून आपण मुक्त व्हावे ही शुभेच्छा.