Thursday, July 20, 2023

विचारयात्रा - परा-पश्यन्ति-मध्यमा-वैखरी

 प्राचीन भारतीय तत्वज्ञानाने अत्यंत शास्त्रीय पद्धतीने दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण केले आहे. भतृहरी ऋषी (इ.स. सुमारे ४५० ते ५००)हे मोठे व्याकरण तज्ज्ञ होते. आपल्या तोंडून शब्द येताना त्याची प्रक्रिया त्यांनी 'वाक्यपदीय' या ग्रंथात समजावून सांगितली आहे. 

आपल्या तोंडातून येणारे शब्द हे प्रथम विचार बनून आपल्या मनात येतात. तोंडावाटे निघणारे शब्द हे 'वैखरी वाणी' बनून येतात. तोंडावाटे शब्द हे प्रथम 'मध्यमा वाणी बनून येतात. एखाद्या बासरीमधून येणारे सूर हे त्या बासरीच्या आत नसतात. ती फुंकणाऱ्या माणसाच्या श्वासातून हे सूर उमटत असतात. बासरी केवळ त्यांना रूप देणारे  यंत्र आहे. तसेच आपल्या तोंडातून निघणारे शब्द हे केवळ आपल्या मनात येणाऱ्या विचारांची अभिव्यक्ती आहे. 

हे विचार आपल्या मनात शब्दरूपाने जन्म घेतात. हे शब्द एखाद्या भाषेचा आधार घेऊनच येतात. मला मराठी, हिंदी अथवा इंग्रजी भाषा चांगली अवगत आहे. म्हणूनच हे विचार केवळ त्याच भाषेचे शब्द घेऊन प्रकट होतील. विचारांचे प्रकटीकरण कोणत्यातरी भाषेच्या साहाय्याने आपल्या मनात होते (अजून तोंडावाटे शब्द बाहेर आलेला नाही), हीच मध्यमा. मध्यमा ही वैखरीपेक्षा अधिक सूक्ष्मात जन्माला येते. 

मात्र हे विचार शब्दात जन्माला येण्याआधी त्यांची जुळवाजुळव मनात सुरु होते. नंतरच त्याला शब्दरूप मिळून ते मध्यमेत उतरते. ही जी शब्दरूप मिळण्याआधी विचारांची अवस्था आहे त्याला भर्तृहरीऋषी 'पश्यन्ति' म्हणतात. 

हे विचार पश्यन्तीमध्ये जन्माला येण्याआधी (काही क्षण तरी) मनाची अवस्था निर्विकार-निर्विचार असते. निर्विकार ही आकाशाची अवस्था आहे. 'आकाश' हे पंचमहाभुतांमधील सर्वात सूक्ष्म आहे. त्याचे तन्मात्र (म्हणजेच प्रकटीकरण) शब्द आहे. विचार मनात येतात (पश्यन्ति अवस्थेत) ते या आकाशातूनच. हीच ती विचारांची परावस्था. याला काहीजण परब्रह्म असेही म्हणतात. 

ज्यावेळी विचार पश्यन्तीमध्ये उतरतात तेव्हा शरीरावर कोठे ना कोठे काही संवेदना उमटतात. कधी श्वासाच्या  गतीत बदल होतो तर कधी शरीराच्या एखाद्या भागावर झिणझिण्या अथवा अन्य संवेदना उमटतात. आपण यावेळी  आपल्या शरीराच्या  संवेदनांप्रति जागृत असलो तर पश्यन्तीकडून हे विचार माध्यमेकडे जाताच आपण त्यांना पकडू शकतो. आपण यावेळी या विचारांवर काही प्रतिक्रिया दिली नाही (समत्व) तर आपल्याला या विचारांचा त्रास होत नाही. पण अनेकवेळा आपण शरीराच्या  संवेदनांप्रति जागृत नसतो. अजाणतेपणी आपण त्यावर प्रतिक्रिया देतो. मग आपण अस्वस्थ होत जातो. 

विपश्यना ध्यानात आपण आपल्या शरीराच्या  संवेदनांप्रति जागृत होतो. त्यामुळे आपण शांत होत जातो. आपल्या ऋषींनी प्राचीन काळी यावर संशोधन करून आपल्याला विपश्यना ध्यानाची देणगी दिली. वेदांमध्ये विपश्यना ध्यानाचा उल्लेख आहे. मात्र प्राचीन काळी हे ज्ञान फक्त गुरु-शिष्य परंपरेने देण्याची पद्धत असल्याने त्याचे विस्तृत विवेचन प्राचीन ग्रंथात नाही. गौतम बुद्धाने विलुप्त झालेली विपश्यना विद्या अथक परिश्रमाने परत शोधून काढली आणि सामान्य लोकांना लाभ व्हावा म्हणून टप्प्याटप्प्याने शिकविण्याची पद्धत विकसित केली. मी ही विद्या गोएंका गुरुजींच्या विपश्यना शिबिरात शिकलो आहे. 

विचारांच्या उगमाचा अभ्यास करणाऱ्या भर्तृहरीऋषींना प्रणाम. 

Wednesday, July 19, 2023

सांख्यदर्शन ५ : कुंडलिनी विद्या आणि आयुर्वेद

 मागील काही लेखात आपण सांख्य दर्शनासंबंधी थोडे जाणून घेतले. सांख्य दर्शन हे अत्यंत प्राचीन दर्शन आहे. काही जण त्याचा उगम वेदांपूर्वीचा आहे असे मानतात. कारण वेदात कपिलमुनींचा उल्लेख आहे.  कदाचित म्हणूनच सांख्यदर्शन वेदांचा पुरस्कार करत नाही, परंतु धिक्कार ही करत नाही. यासाठी हे दर्शन 'नास्तिक' दर्शन मानले गेले आहे.  भारतीय जनमानसावर  याच दर्शनाचा प्रभाव आहे. आयुर्वेद, योग, शाक्तपंथ, कुंडलिनी योग इत्यादी अनेक शाखांचा उगम याच दर्शनात आहे. 

हे दर्शन सत्कार्यवादावर आधारलेले आहे. सत याचा अर्थ अस्तित्व. अस्तित्व हे अस्तित्वातूनच जन्म घेते असे हे दर्शन मानते. या दर्शनात पुरुष आणि प्रकृती ही दोन तत्वे मानलेली आहेत. प्रकृतीकडे असीम क्षमता (Potential) आहे. परंतु या क्षमतेचे प्रकटीकरण प्रकृती करू शकत नाही. कारण त्यासाठी चेतनेची आवश्यकता आहे. या उलट पुरुषाकडे चेतना आहे. परंतु या चेतनेचे प्रकटीकरण करण्यासाठी त्याला प्रकृतीची आवश्यकता आहे. म्हणून ते एकत्र येतात. एकत्र आल्यावर प्रकृती आपल्या खेळात पुरुषाला गुंतविते. मग पुरुषाला आपल्या निरामय चेतना या स्वरूपाचा विसर पडतो. तो स्वतःला प्रकृतीचा एक भाग समजू लागतो. तेथेच दु:खाचा जन्म होतो हे आपण पाहिले. दु:खमुक्तीसाठी पुरुषाला या प्रकृतीच्या खेळातून दूर होऊन आपल्या चेतना स्वरूपाची जाणीव व्हावी लागते. यालाच सांख्य दर्शनात कैवल्य असे नाव आहे. 

कैवल्यावस्थेला जाण्यासाठी पुरुषाला प्रकृतीने ज्या क्रमाक्रमाने बद्ध केले आहे त्याच्या उलट क्रमानेच सोडवून घ्यावे लागते हे आपण मागच्या लेखात पहिले. हा क्रम म्हणजे 
बुद्धी --> अहंकार --> ५ ज्ञानेंद्रिये --> ५ कर्मेंद्रिये --> मन --> ५ तन्मात्रा --> ५ पंचमहाभूते  

कुंडलिनी विद्या ही पुरुषाने अशा उलट्या क्रमाने सोडवून घ्यावे यासाठी निर्मिलेली विद्या आहे. त्यांच्याशी निगडित पंचमहाभूते क्रमश: आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी आहेत. पंचमहाभूतांमध्ये  प्रथम आकाश जन्मले. नंतर क्रमाक्रमाने वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी जन्मली.  कुंडलिनी विद्येच्या प्रवर्तक ऋषींनी या पंचमहाभूतांची आपल्या शरीरातील पाठीच्या कण्यातील स्थाने शोधली. ही स्थाने आपले या पंचमहाभूतांसंबंधी असलेले तादात्म्य नियंत्रण करतात. या स्थानांवर आपले नियंत्रण आल्यास आपण (म्हणजे आपली चेतना - आपला पुरुष) या पंचमहाभूतांशी असलेले आपले तादात्म्य तोडू शकतो. आपण त्यांच्यापासून वेगळे आहोत हे त्याला जाणवते. पुरुषाला प्रकृतीपासून आपण वेगळे आहोत हे जाणवण्याची ही सुरुवात आहे. ही स्थाने म्हणजे कुंडलिनी विद्येत दाखवलेली चक्रे. यात मूलाधार चक्रापासून सुरुवात करून क्रमाने स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध चक्रापर्यंत जायचे असते. ही चक्रे अनुक्रमे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांशी संबंधीत आहेत. म्हणजेच प्रकृतीने पुरुषाला ज्या क्रमाने आपल्यां गुंतविले त्याच्या विरुद्ध क्रमात आहेत. याच क्रमाने आपल्याला आपल्या चेतनेला प्रकृतीपासून मुक्त करायचे आहे. कुंडलिनी योगातील अन्य चक्रे - आज्ञा आणि सहस्रार - ही अनुक्रमे मन आणि बुद्धीशी संबंधित आहेत. एकदा चेतनेचे बुद्धीशी तादात्म्य सुटले की चेतना - म्हणजेच पुरुष - प्रकृतीपासून मुक्त होतो. त्याला आपण प्रकृतीपासून वेगळे आहोत हे उमगते. त कैवल्यला पोचतो. कुंडलिनी विद्या ही सांख्य दर्शनातून उगम पावलेली विद्या आहे. 

प्रकृतीमध्ये असलेले तीन गुण सत्व-रज आणि तमोगुण हे स्वभावत: संतुलित असतात. परंतु पुरुषाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रकृती या तीन गुणांच्या विविध मिश्रणाने सृष्टीतील विविध पदार्थ - ऊर्जा बनविते. लाल, पिवळा आणि निळा या मूळ रंगांची विविध प्रमाणात मिश्रणे करून अनेक रंग मिळविता येतात तसेच काहीसे हे आहे. मानवी शरीरात हेच तीन गुण कफ, पित्त आणि वात या नावाने ओळखले जातात. या तीन गुणांचे संतुलन असते तेव्हा मानवी शरीर आरोग्यपूर्ण असते. मात्र या गुणांचे संतुलन बिघडल्यास आरोग्य बिघडते. आयुर्वेद हे तीन गुण औषधांच्या साहाय्याने संतुलित करण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारे आयर्वेदाचा पाया 'सांख्यदर्शन' आहे. 

सांख्यदर्शन हे भारतीय संस्कृतीशी जोडले गेलेले आहे. भारतीयांवर अद्वैत दर्शनाचा नाही तर सांख्य दर्शनाचा प्रभाव आहे. आपल्या दैनंदिन वापरात असलेल्या अनेक संज्ञा या दर्शनातून आलेल्या आहेत. म्हणून आपल्याला या दर्शनाची किमान माहिती व्हावी हा माझा या लेखमालेद्वारे प्रयत्न होता.  

हा या लेखमालेतील शेवटचा लेख.
लेखनसीमा !

संतोष कारखानीस ठाणे 

सांख्यदर्शन ४

मागील भागात आपण सांख्य दर्शनात प्रतिपादलेली २५ तत्वे बघितली. या पैकी २३ तत्वे 'प्रकृती' या तत्त्वापासून उत्पन्न होतात हे ही पाहिले. प्रकृती या २३ तत्वांच्या साहाय्याने पुरुषाला आपल्या खेळात गुंतविते. सार्वभौम, निरामय चेतना  - अर्थात पुरुष- स्वत:ला  त्या प्रकृतीचा एक भाग समजू लागतो. पुरुषाला आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडणे हेच दु:खाचे मूळ कारण आहे असे सांख्य दर्शन मानते. हे आपण मागील भागात पाहिले.  

सांख्य दर्शनानुसार दु:ख तीन प्रकारचे आहे. अधिभौतिक (अधिदैहिक),अधिदैविक, प्राकृतिक. 

अधिदैविक दु:ख म्हणजे शरीर-मनाला झालेले दु:ख. आपल्याला एखादी जखम झाली, अथवा मानसिक क्लेश झाले तर हे आदिभौतिक दु:ख आहे. आपला जन्म गरिबीत झाला,हे अधिदैविक दु:ख. हे दु:ख आपल्याला भाग्यवश मिळते. पूर, दुष्काळ इत्यादींमुळे होणारे दु:ख हे प्राकृतिक दु:ख आहे. हे तीनही प्रकारचे दु:ख आपली चेतना स्वत:ला 'प्रकृतीचा' एक भाग समजू लागल्यामुळेच होते. 

या दु:खाचे निराकरण करण्याचा उपाय सांख्यदर्शन सुचविते. ज्या क्रमाने प्रकृतीने पुरुषाला - चेतनेला फसविले आहे त्याच्याच उलट्या क्रमाने पुरुष या 'आपण प्रकृतीचा भाग असल्याच्या' भ्रमातून मुक्त होऊ शकतो. जेव्हा पुरुष या भ्रमातून पूर्णपणे मुक्त होतो तेव्हा त्या अवस्थेला सांख्य दर्शनात 'कैवल्य' म्हटले आहे. 

मागील भागात आपण पाहिले खालील क्रमाने प्रकृती पुरुषाला आपल्या जाळ्यात ओढते.

बुद्धी --> अहंकार --> ५ ज्ञानेंद्रिये --> ५ कर्मेंद्रिये --> मन --> ५ तन्मात्रा --> ५ पंचमहाभूते 

पुरुषाला फसविण्यासाठी सर्वात शेवटी पंचमहाभूते आणि त्या आधी तन्मात्रा (रस, गंध, रूप, स्पर्श, ध्वनी) जन्मल्या. तन्मात्रांना  'विषय' असेही नाव आहे. आपल्याला स्वत:पासून [रथां तन्मात्रांना म्हणजेच विषयांना अलग करावे लागेल. एखादे सुंदर रूप पाहिले की त्याची अभिलाषा सोडावी लागेल. एखादा अप्रिय शब्द आपल्याला कोणी बोलला तर आपल्याला त्याने त्रास होता कामा नये. आता मन, ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांपासून पुरुषाला वेगळे करायचे आहे. उदाहरणार्थ आपल्याला ऐकू नसेल अथवा पाय मोडला तर त्यापासून (ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय) होणाऱ्या दु:खापासून आपल्याला दूर जायचे आहे. पुसूंश का केवळ चेतनामात्र हे समजून घ्यायचे आहे. यानंतर मनाला पुरुषापासून अलग करायचे आहे. आपले मन चंचल आहे. सतत भरकटत असते. हे मनाचे भरकटणे आपल्याला अलिप्तपणे जाणून घ्यायचे आहे. मनाचे दु:ख अलिप्तपणे बघायचे आहे. आता पुरुषाला अहंकारापासून दूर करायचे आहे. ही कठीण गोष्ट आहे. अहंकाराचे विसर्जन म्हणजे 'मी' पणाचे  विसर्जन. विविध ध्यान पद्धतींनी हे साध्य होते. आता राहिली बुद्धी. बुद्धीपासून पुरुषाला अलग करणे हे तर खूपच कठीण आहे. आपण सांख्य दर्शन शिकत आहोत तेच बुद्धीच्या साहाय्याने. ध्यानात खूप खोलवर गेल्यावर पुरुष बुद्धीपासूनही स्वत:ला अलग करू शकतो. आता चेतना कैवल्यला प्राप्त होते.  हाच सांख्यदर्शनाने सांगितलेला दु:ख निवारणाचा मार्ग आहे. 

पुढील लेख या लेखमालेतील अखेरचा लेख असेल. 


संतोष कारखानीस ठाणे 


सांख्यदर्शन ३

 मागील भागात आपण सांख्य दर्शनाच्या मूळ सिद्धांताचा वेध घेतला. 'सत्कार्यवाद' हा सांख्य दर्शनाचा मूळ आधार आहे.  सत् याचा अर्थ अस्तित्व. 'अस्तित्व हे अस्तित्वातूनच उदयास येते' असे सत्कार्यवाद सांगतो. म्हणूनच अस्तित्व हे शून्यातून उदयास आले असे सांगणाऱ्या बौद्धदर्शनापेक्षा आणि अस्तित्व हे परमेश्वराने निर्माण केले असे सांगणाऱ्या अन्य दर्शनांपेक्षा ही वेगळी भूमिका आहे. 

 सत् कारणापासून सत् कार्य उदयास येते असे सत्कार्यवाद सांगतो. या सत् कारणाला सांख्य दर्शनात 'प्रकृती' असे संबोधले आहे.  प्रकृतीचा शब्दश: अर्थ आहे 'कृतीच्या आधी'.  प्रकृती ही 'जड' आहे तिच्यात प्रचंड क्षमता (potential) आहे पण कोठलीही चेतना नाही.  प्रकृतीकडून कार्य करून घेणाऱ्या चेतनेस या दर्शनात 'पुरुष' असे संबोधले आहे. 

पुरुष आणि प्रकृती एकमेकांजवळ का येतात हे आता समजून घेऊ. 
एखादी गोष्ट 'कारण' होण्यासाठी तिच्यातील क्षमतांचे प्रकटीकरण व्हावे लागते. प्रकृतीच्या क्षमतांचे प्रकटीकरण व्हावे म्हणून प्रकृती सदैव बेचैन असते. पुरुष हा केवळ चेतनामात्र आहे, निर्गुण आहे. जी अनुभव घेऊ शकते तिला चेतना म्हणतात. अनुभवांशिवाय चेतनेला अर्थ नाही. पुरुषाला तो 'चेतना' आहे हे सिद्ध करण्यासाठी अनुभव घ्यावे लागतात. म्हणूनच प्रकृती आणि पुरुष हे एकत्र येतात. प्रकृतीला आपल्या अनुभवांचे प्रकटीकरण करण्यासाठी पुरुषाच्या चेतनेची- इच्छाशक्तीची- आवश्यकता असते. तर प्रकृतीने निर्मिलेल्या विश्वाचा अनुभव पुरुष घेऊ शकतो. आपल्या अस्तित्वाला अर्थ प्रदान करण्यासाठी प्रकृती आणि पुरुष एकत्र येतात. 

प्रकृती एकच आहे, परंतु तिची क्षमता असीम आहे. पुरुष मात्र संख्येने अनेक आहेत. पुरुष ही केवळ चेतना आहे. तिचे काम 'अनुभव घेणे' हेच आहे. विश्वात अनेक जीव आहेत. एकाच घटनेचे अनुभव प्रत्येक जीवाला वेगळे येतात. म्हणूनच सांख्य दर्शनाच्या प्रणेत्यांनी अनेक पुरुष आहेत असे मानले. 

जेव्हा एखादा पुरुष आणि प्रकृती जवळ येतात तेव्हा तो पुरुष प्रकृतीचा अनुभव घेऊ लागतो. यावेळी प्रकृती 'विकृत' होऊ लागते. प्रकृतीचा खेळ चालू होतो.  प्रथम प्रकृती पुरुषामध्ये बुद्धी (महत् ) उत्पन्न करते. बुद्धीमुळे पुरुष प्रकृतीच्या खेळात फसतो. बुद्धीमुळे पुरुष प्रकृतीचा अधिक खोलात शिरून अनुभव घेऊ इच्छितो.  मग प्रकृती पुरुषांमध्ये अहंकार हे दुसरे तत्व उत्पन्न करते. या वेळपर्यंत आपल्याला आपल्या आसपासच्या निसर्गापासून पुरुष वेगळे समजत नसतो. परंतु अहंकाराचा जन्म होताच तो स्वत:ला वेगळे समजू लागतो. आता प्रकृतीच्या खेळात पुरुष अधिकाधिक गुंतत जातो. 

पुरुषाला अहंकार प्राप्त झाल्यावर आपले वेगळे रूप असावे असे साहजिकच वाटते. मग जन्मतात ११ इंद्रिये आणि पाच तन्मात्रे.  प्रथम पाच ज्ञानेंद्रिये बनली (डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा). प्रकृतीच्या सत्व-रज-तम गुणांपासून ही  पंचेंद्रिये बनली. आजवर केवळ बुद्धीने प्रकृतीचा अनुभव घेता येत होता. आता त्या जोडीला ही पंचेंद्रिये आली. पंचेंद्रियांद्वारे पुरुष प्रकृतीचा अनुभव चांगल्याप्रकारे घेऊ शकला.  पुरुष प्रकृतीमध्ये अधिकाधिक गुंतत चालला आहे. 

आता प्रकृती सुचवीत आहे की माझा हा खेळ बराच काळ चालणार आहे. त्यामुळे पुरुषाला प्रकृतीचा हा अनुभव बराच काळ घेण्यासाठी प्रकृती सुचविते. म्हणून आता शरीराला प्रकृतीने पाच कर्मेंद्रिये दिली. हात पाय, लैंगिक इंद्रिये, मुख आणि गुदद्वार दिले. अशाप्रकारे प्रकृतीने पुरुषाला पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये दिली. तसेच एक मन ही दिले. बुद्धी प्रथम आली. बुद्धी निर्णय घेऊ शकते. मन चंचल असते. ते निर्णय घेऊ शकत नाही.  मनाला उभयेंद्रिय म्हटले आहे. हे एकाबाजूने ज्ञानेंद्रिय आहे तर दुसरीकडे कर्मेंद्रियही आहे. अशाप्रकारे प्रकृतीने चेतनेला आपल्यात पूर्णपणे गुंतविले आहे. आता पुरुष स्वत:लाच प्रकृतीचा एक भाग समजू लागला. 

परंतु फक्त ज्ञानेंद्रिये असून उपयोग नाही. जर ध्वनीचा नसेल तर कानाचा काय उपयोग? जर डोळे असतील तर किमान काही अनुभवण्यासाठी त्यासोबत एखादे रूप हवे. मग प्रकृती अनुभव देण्यासाठी तन्मात्रे बनविते. डोळ्यांसाठी रूप, कानासाठी 'शब्द', नाकासाठी 'गंध', जिभेसाठी 'रस', त्वचेसाठी 'स्पर्श'  अशी ही पाच तन्मात्रे आहेत. हे आपल्या ज्ञानेंद्रियांसाठी 'विषय' आहेत. या तन्मात्रांमधून पंचमहाभूते जन्मतात. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश अशी ही पंचमहाभूते तन्मात्रांमध्ये जन्मतात. प्रकृतीमधून अशी २३ तत्वे जन्म घेतात. प्रकृती आणि पुरुष यांना धरून अशी २५ तत्वे सांख्य दर्शनात मानली गेली आहेत. या प्रकृतीच्या २३ तत्वांचे एकाच काम आहे. पुरुषाला फसवून  तो प्रकृती आहे असा भ्रम  त्याच्यात निर्माण करणे. 

खालील क्रमाने प्रकृती पुरुषाला आपल्या जाळ्यात ओढते.

बुद्धी --> अहंकार --> ५ ज्ञानेंद्रिये --> ५ कर्मेंद्रिये --> मन --> ५ तन्मात्रा --> ५ पंचमहाभूते  

अशाप्रकारे निरंजन-निर्विकार असलेली चेतना फसते आणि स्वतः:ला प्रकृती समजू लागते.  हेच दु:खाचे मूळ कारण आहे असे सांख्य दर्शन मानते. 

पुढील भागात आपण याचा अधिक विस्ताराने विचार करू. 

----------------------------------------------------------------------------


सांख्य दर्शन - २

 सांख्य दर्शनाचे प्रणेता आणि हे दर्शन कसे विकसित होत गेले हे आपण मागील भागात पाहिले. आता या दर्शनात काय सांगितले गेले आहे ते पाहू. 

कोणत्याही दर्शनाचा एक आधार असतो. 'सत्कार्यवाद' हा सांख्य दर्शनाचा आधार आहे. याचा अर्थ सत् कार्याच्या निर्मितीसाठी सत् कारणांची उपस्थिती आवश्यक असते. सत् याचा अर्थ 'अस्तित्व' हे आपण पूर्वी अद्वैतवाद शिकताना पाहिले आहे. याचा अर्थ अस्तित्व हे केवळ अस्तित्वातून निर्माण होऊ शकते. ते शून्यातून (असत्) अथवा अन्य कशातूनही निर्माण होऊ शकत नाही. एखादी दैवी शक्ती अस्तित्व निर्माण करू शकत नाही. हाच सत्कार्यवाद आधुनिक विज्ञानाचा आधार आहे. आधिनिक विज्ञानाच्या बिग बँग सिद्धांतानुसारही विश्व एका बिंदूतून निर्माण आले आहे, शून्यातून नाही. 

सत्कार्यवादाचे दोन पैलू आहेत. 'कारण' आणि 'कार्य'. 'कार्य' म्हणजे परिणाम. कारणात कार्य घडविण्यासाठी योग्य असा शक्तिसंचय (Potential) असावा लागतो. कारण हे दोन प्रकारचे असते. 'निमित्त कारण' आणि 'उपादान कारण'. जर आपल्यासमोर एक मातीचा घट आहे. तर तो अस्तित्वात येण्यामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे 'माती' आणि दुसरे म्हणजे 'कुंभार'. जर माती नसेल तर तो घट बनविता येणार नाही. तसेच कुंभार नसेल तरीही तो घट बनविता येणार नाही. कुंभार हे 'निमित्त कारण' आहे तर माती हे 'उपादान कारण' आहे.  'ईश्वराने ' ही सृष्टी बनवली असे मानणारी दर्शने/धर्म केवळ निमित्त कारण दर्शवितात असे कपिलमुनींचे मत होते.  म्हणूनच कपिलमुनींनी 'उपादान कारणाचा' शोध घेण्यास सुरुवात केली. 

आपल्यासमोर 'कार्य' अस्तित्वात आहे. तेव्हा कारण असलेच पाहिजे. पण कधीकधी कारण आपल्याला समोर येत नाही. उदाहरणार्थ ही सृष्टी आपल्यासमोर आहे. म्हणजेच 'कार्य' आहे. पण त्यामागचे कारण आपल्यासमोर नाही. अशावेळी अनुमानाच्या साहाय्याने आपल्याला कारणाचा शोध घ्यावा लागतो. उदाहरणार्थ आपल्यासमोर मातीचा घडा आहे. आपण लोखंड, माती, लाकूड इत्यादी बघून या घड्याच्या 'उपादान' कारणाचा वेध घेऊ शकतो. हा घडा मातीचा बनला असेल असे सांगू शकतो. 

जेव्हा आपल्या ऋषीमुनींनी ब्रह्माण्ड पाहिले तेव्हा एक अनुमान असे होते की हे ब्रह्माण्ड ज्यापासून तयार झाले (उपादान कारण) हे ब्रह्माण्डासारखेच असले पाहिजे. ब्रह्माण्डात काही गोष्टी प्रकाशमान आहेत, काही गतिमान आहेत तर काही अंध:कारमय आहेत. पृथीवरील माणसांचे निरीक्षण करतानाही असे दिसले की काही माणसे प्रसन्न आहेत, आपली कामे प्रसन्न चित्ताने वेळच्यावेळी करत आहेत, काही माणसे अत्यंत धावपळीत आहेत, आपली कामे वेगात करण्याचा प्रयत्न करीत आहे, पण ती थकलेली आहेत. प्रसन्न नाहीत. तर काही माणसे आळसात जीवन घालावीत आहेत, प्रसन्न नाहीत. अशा प्रकारे ब्रह्माण्डातील विविध गोष्टींचे वर्गीकरण या ऋषीमुनींना तीन प्रमुख प्रकारात करता आले. त्यामुळे सृष्टीनिर्मितीच्या  मूळ उपादान कारणातही ही तीन गुण असले पाहिजेत असे अनुमान त्यांनी काढले. सृष्टीच्या उपादान कारणाला त्यांनी 'प्रकृती' हे नाव दिले. प्रकृती याचा अर्थ प्र+कृती. प्र म्हणजे आधीचे कृती म्हणजे कार्य. प्रकृती 'प्रधान' आहे असे त्यांनी मानले. 'प्रधान' म्हणजे सगळ्याच्या पूर्वी. प्रकृतीला 'सर्वगर्भा' असेही नाव दिले. 

वर पाहिलेलं हे जे तीन गुण प्रकृतीत असले पाहिजेत असे ऋषीमुनींनी म्हटले आहेत त्यांना सत्व, रज आणि तम अशी नावे दिली.  सत्वगुण प्रकाशमान आहे, रजगुण गतिमान आहे तर तमोगुण अंध:कारमय आहे, उदासीन आहे. मूळ प्रकृतीत हे तिन्ही गुण साम्यावस्थेत (Equilibrium) असले पाहिजेत. म्हणूनच मूळ प्रकृती निर्गुण आहे, Formless आहे. या मूळ प्रकृतीमध्ये कोठलीही चेतना नाही, ती 'जड' आहे, 'अव्यक्त' आहे. मात्र ती असीम (Infinite Potential)आहे.   मातीपासून घडा बनवायचा का अन्य काही हे माती हे सांगू शकत नाही. कारण माती ही 'जड' आहे, चेतनाशून्य आहे. तसेच प्रकृती तिच्या तीन गुणांपासून विश्वाची जडणघडण करू शकत नाही. 

मातीपासून घट बनविण्यासाठी कुंभाराची आवश्यकता आहे, चेतनेची आवश्यकता आहे, 'निमित्त कारणाची' आवश्यकता आहे. तसेच प्रकृतीपासून सृष्टीच्या निर्मितीसाठी चेतनेची आवश्यकता आहे. याच चेतनेला 'पुरुष' असे संबोधले गेले आहे. प्रकृतीत असलेल्या सत्व, रज, तम या तीन गुणांच्या मिश्रणाने ही सृष्टी बनते (तीन मूळ रंगांच्या साहाय्याने सगळे रंग बनतात तसेच). या गुणांचे कोणत्या प्रमाणात मिश्रण करायचे हे पुरुषाची चेतना ठरवते. 

पुढील लेखात आपण सृष्टी निर्मितीच्या अधिक खोलात जाऊ. तेथून आपण आपल्याला अनुभवायला लागणाऱ्या दु:खाचे कारण शोधू. या दु:ख निवारण्यासाठी सांख्य दर्शन काय सांगते हे पाहू. या दर्शनाची मोक्षाची कल्पना काय आहे ते ही पाहू.